सोमवार, ३० नोव्हेंबर, २००९

स्वाईन फ्लु

स्वाईन फ्लु आजाराने भल्याभल्यांची तारांबळ उडविली ,बघावे तिकडे तोंडावर मास्क ,रुमाल नाहितर फडकं बांधलेले अनेक जण दिसू लागले.स्वाईन फ्लु आजाराने पळणारे आम्ही.. तसे समाजात वावरतांना अनेक वेळा मास्क बांधूनच वावरत असल्याची जाणीव यावेळी मात्र प्रकर्षाने झाली.शाळेतील फि वाढ असू दे नाहितर वाढलेली तुरडाळ असू दे.सरकारी कार्यालयात दाखल्यासाठी १०० रु.हातावर टेकतानाही आम्ही तोंडावर मास्क बांधलेला असतोच की !.भारनियमन होऊनही आम्ही विजेसाठी जादा दर मोजायचे, ६ वा वेतन आयोग आम्हाला नसला तरी महागाई आम्ही सोसायची.उच्च शिक्षणासाठी लाखों रुपये डोनेशन देताना आपल्या तोंडावर आणि डोळ्यावर मास्क हा असतो.रेशनचे कुणाच्यातरी वाट्याचे धान्य काळ्याबाजारात विकताना डोळ्यांना दिसते पण बोलणार कसे ? तोंडावर मास्क ! हा मास्क ही बाजारात जादा भावाने घेताना कुणी काहिच बोलत नाही कारण त्यांच्या तोंडावर अगोदरच एक मास्क आहे. तोंडावर मास्क ,कानात ईअर फोन नाहितर कानाला चिकटलेला मोबाईल, डोळ्यावर गाँगल .मरणाच्या भितीने आपण पळतोय खरे पण अश्या कितीतरी व्ह्यायरसने आपलं जीवन या अगोदरच ग्रासून टाकलं आहे याची साधी जाणिव आपल्याला आहे का ?

Next Genaration

रायगडावर जायचं म्हणजे आता चालत,चढत जाणाची गरज नाही.केवळ चारच मिनीटात रोपवेने आपण
रायगडावर जातो.आमच्या आधुनिकतेचे, प्रगतीचे हे आणखी एक उदाहरण.याच रायगड जिल्ह्यातील अनेक गावे उन्हाळ्यात पाणीपाणी करतात.ही एक वस्तुस्थिती.
दोन हजार सालापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र टँकरमुक्त करण्याच्या घोषणा तशा कानात आता बुजून गेल्यात.रस्त्यांनी जाताना डोक्यावर तीनतीन हंडे आणि कंबरेला कळशी घेऊन ४-५ कि.मी.पाण्यासाठी अनवाणी जाणार्‍या आमच्या मायभगिनी पाहिल्या कि स्वातंत्र्यप्राप्तीची ६३ वर्ष आठवतात. ६३ वर्षात आमची प्रगती वाखाणण्याजोगी..खेड्यातल्या प्रत्येक दुकानात मला शीतपेयाच्या बाटल्या दिसतात.लटकणार्‍या चिप्स्च्या बंद पिशव्या दिसतात.एखाद्या भिंतीवर next genaration असे लिहिलेली भलीमोठी जाहिरात दिसते.त्यांच्या मताप्रमाणे पुढच्या पिढीला अशी शीतपेय कदाचित हवीही असतील.रायगडावरील हाँटेल असो नाहीतर कुठलही खेडेगाव असो! अनेक दुकानं अशा शीतपेयाच्या बाटल्यांनी भरून गेलेली असतात.
आटलेल्या विहीरी, प्रदुषीत नद्या, भ्रष्ट शासन , अधिकार्‍यांमुळे रेंगाळलेल्या पाणीपुरवठा योजना सार काही आता सरवल्या प्रमाणे आपल्या नजरेआड झालयं.अनेक गावात आता बिअर शाँपीही दिसू लागल्या आहेत.गावागावात ,वळणावळणावर शीतपेयांचे ट्रक धावतात आणि जाहिरातीतून क्रिकेटपट्टूही शीतपेय प्या असे सांगतात.त्याचवेळी भर उन्हात,पायाला चटके सोसत..डोक्यावर हंडे व कंबरेला कळशी घेऊन जाणारी ती , या शासनाला आणि आपल्या नशीबाला काय सांगणार?.खेडयात राहाणार्‍या जनतेला फक्त एकवेळ पाणी हवयं.
शीतपेय घेऊन जाणारा ट्रक जेव्हा गावातील प्रत्येक वळ्णावर थांबतो तिथेच पाण्याच्या आशेने कित्येक जण आवंढा गिळताना दिसतात.
next genaration असं म्हणत त्यांनी पुढच्या पिढीचं भवितव्य ३०० मि.ली च्या बाटलीत कधीच सिलबंद करून टाकलयं.
.....................................

बहिणाबाईंचे काव्य आजच्या काळातही मार्गदर्शक

मन वढाय वढाय....असं म्हणत मानवी मनाचा गुंता जिने आपल्या कवितेत रेखाटला,कशाला काय म्हणू नये हे जिने जाणलं , संसाराची व्याख्या जिला पुर्णपणे कळली ,माणूस.माणूस कधी होईल याचा जिला ध्यास लागला ,वाट्च्या वाटसरुलाही जिने मार्ग दाखविला अशी महान कवयित्री बहिणाबाई’,,,,
जांच्या तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द काव्य होऊन बाहेर पडायचा.बहिणाबाईंना जाऊन ५७ वर्ष पूर्ण झाली परंतु त्यांच्या कविता आजच्या काळातही चपलख लागु होतात.
घरापासून मळ्यापर्यंत हा बहिणाबाईंचा रोजचा प्रवास होता, कागद पेन दूरच पण अक्षरांची साधी ओळखही जांना नव्हती त्यांची गाणी.कविता ओव्या आजच्या काळाही मार्गदर्शक ठरणार्‍या आहेत .मळा, मोट,पाणी चूल, तवा शेतीची कामे,घरोटा या आपल्या नित्याच्या वापरात असलेल्या साधनांचे दाखले देत बहिणाबाईंनी सार्‍या विश्वाला मोठे तत्वज्ञान सांगितले आहे.आज माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्ञानाच भांडार खूलं झालेलं आहे.तरिही अशी वाड:मय निर्मिती झाली नाही परन्तु जीवनात जे दिसलं,जे अनुभवलं ते सहज मांडलं आणि त्यातुन बहिणाबाईंनी जबरदस्त वाड:मयाची निर्मिती केली.
आजचं युग ग्लोबलायझेशनचे युग आहे, प्रत्येकाला काही ना काही मिळ्वण्याची आस आहे.त्यातही माणूस समाधानी नाही.अशा असमाधानी वृत्तितून अनेकांची नैराश्याकडे वाटचाल चाललेली दिसते,स्व:त करत असलेल्या कामावर श्रद्धा नसल्याने काम पूर्ण केल्याचे समाधान मिळत नाही .कामाच्या समाधानापेक्षा गलेलठ पगार आज सर्वांची गरज बनत चाललीय.प्रत्येक गोष्ट सहज आणि कमी श्रमात मिळावी अशी अनेकांची इच्छा असते पण कष्टाला शाँर्टकट नसतो.श्रमाशिवाय काही नाही.हाताला चटका बसल्याशिवाय भाकर मिळत नाही हे बहिणाबाईंनी सांगितले आहे
अरे संसार संसार
जसा तवा चुल्हयावर
आधि हाताला चटके
तवा मिळते भाकर
कामाच्या ताणतणावाखाली जगणार्‍यांना बहिणाबाईंची ही कविता उत्तम मार्ग दाखवीणारी ठरेल.त्या म्हणतात
येरे येरे माझ्या जिवा
काम पडलं अमाप
काम करता करता
देख देवाजीचं रूप
काम करताना देवाचं रूप पाहिलं ,कामालाच देव मानल तर काम निभावून नेण सहज शक्य होईल.मनाला समाधान न मिळाल्यानं माणूस मन:शांती ,ज्योतिषी अशा गोष्टींकडे ओढला जातो.आजकाल अनेक वाहिन्या ,ज्योतिषीच्यांचे कार्यक्रम दाखवतात.वास्तुशास्त्र ,फेंगशुइ प्रतिष्टॆचे बनले आहे.पण ज्योतिष म्हणजे काय हे बहिणाबाईंनी कित्येक वर्षापूर्वी जाणलं.दारी आलेल्या ज्योतिषीला त्यांनी परत पाठवले.माझ नशीब मला माहित आहे असं सांगणार्‍या बहिणाबाईं खंबीर महिलेचे दर्शन घडवतात.
बापा नको मारु थापा
असो खर्‍या, असो खोट्या
नहि नशिब नशिब
तय हाताच्या रेघोट्या
नको नको रे जोतिष्या
नको हात माझा पाहू
माझं दैव मला कये
माझ्या दारी नको येऊ
आजच्या काळात जी स्थिती ज्योतिषाची तीच देवधर्माची.आजकाल मंदिराचाही बाजार मांडलेला दिसतो.देवाला हिरेजडित मोबाईल,गणपतीच्या चरणी २०० कि.सोनं,देवदर्शनाला सेलिब्रेटी अशा अनेक बातम्या वृत्तपत्रात ,वाहिन्यांवर वारंवार दिसतात आणि देवाला गरीब श्रीमंत अशा भेदभावात तोलल जातय.याची जाणीव बहिणाबाईंना झाली होती.
सोन्यारूपान मढला,मारवाड्याचा बालाजी
शेतक-याचा इठोबा,पानाफूलामधी राजी
अरे बालाजी.-इठोबा दोन्ही एकज रे देव
गरीबीनं सम्रीतीनं केला केला दुजाभाव
गरीब आणि श्रीमंत अशा दुजाभावात देवाला भक्तांनी अडकवल्याचे वर्णन जितक्या प्रभावीपणे त्यांनी केलय़ तितक्याच भावपूर्ण शब्दात दर्शनाला जाऊ न शकणा-या शेतक-याची व्यथा मांडलेय.राज्यात दुष्काळ,कर्जबाजारीपणामुळे होणा-या शेतक-यांच्या आत्महत्या या काळात एखाद्या शेतक-याच्या तोंडी ही ओवी चपखल बसू शकते.
अरे पांडूरंगा तुझी
कशी भक्ती करू सांग
तुझ्या रूपा आड येत
सावकाराचं रे सोंग
बहिणाबाईंची गाणी केवळ तत्त्वज्ञान सांगणारी नव्हती तर बहिणाबाईंना विनोदाचीहि जाण होती.आज पी.जे.ग्राफिटीचं युग आहे. २४ तास टिकत नाही तिला टिकली क म्हणतात?
असा प्रश्न आजचा तरुण सहज विचारतो तसे काही प्रश्न बहिणाबाईंनीही विचारले आहेत.परंतु त्यांच्या विनोदामध्ये भावार्थ दडला आहे.ज्याच्यातून पीठ येत त्याला जातं म्हणू नये ,तसेच गुढी उभारतो त्याला म्हणती पाडवा आणि ऊभा जमिनीमध्ये आड त्याला म्हणती उभ्याले.असे गमतीदार प्रश्नही त्यांच्या गाण्यातून प्रकट्लेले दिसतात.
माणसाचं आयुष्य,मानवी मन याचा फार मोठा अभ्यास बहिणाबाईंना अनुभवातून झालेला दिसतो.
मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर
अरे इंचू साप बरा
त्याले उतारे मंतर
उतारे नसललं माणसाचं मन कालही तसच होतं आजही तसच आहे.माणूस माणूसपण विसरल्याची उदाहरणे समाजात मोठ्या प्रमाणत दिसतात .भ्रष्टाचार,अत्याचार,प्रांतिक-भाषिक वादिवाद ,बाँम्बस्फोट अशा घटनांनी माणसाचं माणूसपण हरवून गेलं आहे
मानसा मानसा कधी व्हशील मानूस
लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस
इतके वर्षांनंतर आजही बहिणाबाईंनी रेखाटलेले मानवीवृत्तीचं दर्शन कुठे बदललय ?
सहज कुठेही कधीही सुचलेली बहिणाबाईंची गाणी आजच्या युगातही खूप काही सांगून जातात.ज्याला बहिणाबाईंची गाणी ज्याला कळली त्याला जीवन कळले असं म्हणावं लागेल.
बहिणाबाईंना जीवन कधीच कळलं होतं.
आला सास गेला सास
जीवा तुझं रं तंतर
असे जनम मरन
एका सासाचं अंतर
जीवनाचं अगाध तत्त्वज्ञानआपल्या सहज सुंदर कविता ,गाणी ओवी,म्हणीतून मांडणारी ही महान कवयित्री आज आपल्यात नसली तरी तिची वाड:मय सम्रृध्दी पुढ्च्या काळातही
अबाधित राहिल अशीच आहे.
...........................................................................................
लेखक-सुनिल पाटकर

अर्धा कप चहा

चहा पिणं हा तसा प्रत्येकाचा आवडता शौक .मी तसा सतत फिरत असल्यामुळे कुठेनंकुठे अर्धा कप चहा आमचा होतचं असतो.अगदी ए.सी. रुमअमध्ये बसून नाहीतर चहाच्या टपरीवर चक्क उभं राहून.वेगवेगळ्या स्तरात वेगवेगळ्या चवीचे चहा मी रिचवला आहे.
सरकारी कार्यालयात कामानिमित्त नेहमीच फेर्‍या होत असतात,असाच एकदा कार्यालयात चहा मागविण्यात आला.चहा घेऊन येणारा ‘पोर्‍या‘ असेल १०-१२ वर्षाचा! .हातात चहाची किटली आणि बोटात अडकवलेले कप.कपात चहा ओतून तो दरवाजाजवळ आमचा चहा संपायची वाट पाहात उभा होता.सहज माझी नजर त्याच्या हाताकडे गेली.त्याच्या मनगटावर मला एक डाग दिसला.मी त्याला विचारलं ‘हा डाग कसला ?’ माझ्या प्रश्नावर तो घाबरला,रडवेलाही झाला.खूप वेळा विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं ‘मालकाने गरम झारीचा डाग दिला,हातून चहाचा कप फुटला म्हणून ’.मला त्याला खूप काही विचारायचे होते त्याचे नाव.. त्याचे गाव .पण मालक ओरडेल या भितीनं तो काहिही न बोलता चहाचे कप उचलून निघून गेला.सहज चर्चा करताकरता एवढच कळल कि त्याला ५०० रु.पगार मिळतो आणि ते पैसे तो घरी पाठवतो.
दिवसभर त्याचा विचार मनात घोळत होता.हाँटेलातील तो पोर्‍या ...त्यांची नाव पण अशीच छोटया ,बारक्या, काळ्या..असे लाखों बालमजूर आज आपल्यात वावरतात
सायंकाळी घरी आलो.कंटाळा घालवण्यासाठी टि.व्ही लावला.. टि.व्ही वर जाहिरात लागली होती.एस्सल वर्ड में रहुंगा मै...घर नही जाऊंगा मै.....हसणारी..आगगाडीत बसणारी...बागडणारी मुलं या जाहिरातीत खूप मजा करत होती.आपल्याला,आपल्या मुलांना अगदी तोंडपाठ झालेली ही जाहिरात.
एकिकडे हसणारी..बागडणारी मुलं आणि त्यावर सहज उडविले जाणारे २००-३०० रुपये.आपल्या देशात केवढी ही विषमता.
महासत्ताक बनू पाहणार्‍या माझ्या भारतात आजही कित्येक गल्ली-बोळात ,टपरीवर, हातगाडीवर हजारों छोटया ,बारक्या, काळ्या फक्त जगण्यासाठी धडपडत आहेत हे मला त्या अर्धा कप चहाने दाखवून दिलय.
............................................................................................................................

एका राजाची गोष्ट

ते येणार म्हणून ती डोळ्यात तेल घालून त्यांची वाट पहात .हजारो कदाचित लाखोही असेच त्यांची वाट पाहात उभे होते.ते त्यांच्यावर फुलांची बरसात करण्यासाठी ,त्यांच्या नावाचा जयघोष करण्यासाठी तर काही आनंदानी नाचण्यासाठी। कुणी त्याना व्यासपीठावर घेउन जाण्यासाठी उत्सुक होते.तर कुणी त्यांच्यासोबत आपण फोटोत कसे येऊ यासाठी तयार होते.पत्रकार ही आपली डायरी घेऊन तयार होते.तसे तिला याचे काही नविन वाटत नव्हते ,काही गोष्टी तिच्या 75 वर्षाच्या नजरेत जशाच्यातश्या बसलेल्या॥ काही व्यक्ति बदलल्या ..काही कपडे.., तर काही टोप्या..छोट्याशा टेकडीवरची तिची झोपडी आजही तशीच होती.तिच्या कुशीत तिची पणतवंड वाट पाहात होती रात्री आई-बाप काहीतरी खायला आणेल या आशेवर ।
चार मडकी पाणी पिऊन संपलेली..चुलीत विझलेली लाकडे .चूल फक्त पाणी तापविण्यासाठी .आपल्या पणतवंडाना समजावत ती म्हणाली `आता बघ इमान येईल त्यातून राजा उतरेल ।आपल्याला काहीतरी खायला देईल...तुला कपडा , बाबाला नोकरी ।तिचे शब्द ओठाताच राहिले आकाशात हेलीकाप्टर भिरभिरु लागले .त्यांच्या नावाचा जयजयकार झाला पणतवंडाना घेउन ती बाहेर आली .`ते बघ ईमान. राजा आला मूलं हेलिकोँपटरकडे बघून उड्या मारू लागली ।
ते उत्तरले लाखों फूले तांच्या अंगावर उधळली गेली॥ जयजयकारात ते स्टेजकडे निघाले तिथे ते नेहमीची भाषणे देणार होते.मैदानावरची डोळ्यात गेलेली धुळ तिने झटकली.डोळ्यातून तसं पाणीच आलं.थोड्या वेळेन मूलं पुन्हा रडू लागली .भूक...भूक करू लागली. ती अस्वस्थ झाली दूरवर राजाचे भाषण तिच्या कानावर येत होते पोरांचा बाप दारू पिऊन ढकलत येत होता .आई काहीतरी घेऊन आली पोर तिच्याकडे धावली .तिच्या हाताताले ओढून पटापट खायला सुरवात केली.पोराना खाताना बघून आई सुखावली ।
भाषण संपल्यावर राजा परतला ,पोर यावेळी धावली नाहीत .म्हातारीही झोपडिच्या बाहेर आली नाही . राजा बदलला... झोपडी तीच होती ।साठ वर्षानन्तरही कुठलाच राजा तिच्या झोपडिकडे वळला नाही ।
कधितरी खूप वर्षापूर्वी तिच्या बालपणी एक राजा तिच्या झोपडीत आला होता .उघडा.......फक्त पंचा नेसलेला .....हातात काठी घेऊन .....तिच्या सारख्या असंख्य माता भागिनीना तो भेटला होता.त्यांची सुखदू;ख जाणून गेला होता त्यावेळी त्याच्या विमानाची धुळ तिच्या डोळ्यात गेली नाही कारण तो चालत आला होता अनवाणी ।
आज म्हातारी तीच होती बदलला होता फक्त राजा .बदललेला राजा उघडा नव्हता .त्याच्या अंगावर होती खादी आणि हातात होता महागडा मोबाइल....तो राजा सत्यासाठी झगडत होता , हां राजा सत्तेसाठी झगडत आहे ।

सुनील पाटकर