सोमवार, ३० नोव्हेंबर, २००९

Next Genaration

रायगडावर जायचं म्हणजे आता चालत,चढत जाणाची गरज नाही.केवळ चारच मिनीटात रोपवेने आपण
रायगडावर जातो.आमच्या आधुनिकतेचे, प्रगतीचे हे आणखी एक उदाहरण.याच रायगड जिल्ह्यातील अनेक गावे उन्हाळ्यात पाणीपाणी करतात.ही एक वस्तुस्थिती.
दोन हजार सालापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र टँकरमुक्त करण्याच्या घोषणा तशा कानात आता बुजून गेल्यात.रस्त्यांनी जाताना डोक्यावर तीनतीन हंडे आणि कंबरेला कळशी घेऊन ४-५ कि.मी.पाण्यासाठी अनवाणी जाणार्‍या आमच्या मायभगिनी पाहिल्या कि स्वातंत्र्यप्राप्तीची ६३ वर्ष आठवतात. ६३ वर्षात आमची प्रगती वाखाणण्याजोगी..खेड्यातल्या प्रत्येक दुकानात मला शीतपेयाच्या बाटल्या दिसतात.लटकणार्‍या चिप्स्च्या बंद पिशव्या दिसतात.एखाद्या भिंतीवर next genaration असे लिहिलेली भलीमोठी जाहिरात दिसते.त्यांच्या मताप्रमाणे पुढच्या पिढीला अशी शीतपेय कदाचित हवीही असतील.रायगडावरील हाँटेल असो नाहीतर कुठलही खेडेगाव असो! अनेक दुकानं अशा शीतपेयाच्या बाटल्यांनी भरून गेलेली असतात.
आटलेल्या विहीरी, प्रदुषीत नद्या, भ्रष्ट शासन , अधिकार्‍यांमुळे रेंगाळलेल्या पाणीपुरवठा योजना सार काही आता सरवल्या प्रमाणे आपल्या नजरेआड झालयं.अनेक गावात आता बिअर शाँपीही दिसू लागल्या आहेत.गावागावात ,वळणावळणावर शीतपेयांचे ट्रक धावतात आणि जाहिरातीतून क्रिकेटपट्टूही शीतपेय प्या असे सांगतात.त्याचवेळी भर उन्हात,पायाला चटके सोसत..डोक्यावर हंडे व कंबरेला कळशी घेऊन जाणारी ती , या शासनाला आणि आपल्या नशीबाला काय सांगणार?.खेडयात राहाणार्‍या जनतेला फक्त एकवेळ पाणी हवयं.
शीतपेय घेऊन जाणारा ट्रक जेव्हा गावातील प्रत्येक वळ्णावर थांबतो तिथेच पाण्याच्या आशेने कित्येक जण आवंढा गिळताना दिसतात.
next genaration असं म्हणत त्यांनी पुढच्या पिढीचं भवितव्य ३०० मि.ली च्या बाटलीत कधीच सिलबंद करून टाकलयं.
.....................................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा