शुक्रवार, १० सप्टेंबर, २०१०

यूपीएससी परीक्षा अन्‌ पालकांची भूमिका

( सौजन्य- ई-सकाळ)
कृष्णा भोगे, कार्याध्यक्ष, राज्य मानव विकास मिशन

आपल्या मुला-मुलींनी जीवनात फार मोठे व्हावे, समाजात त्यांना मान सन्मान मिळावा आणि सुखी जीवन जगा, अशा प्रकारची इच्छा जवळजवळ सर्वच पालकांची असते. त्यामुळे सर्वच पालकांना असे वाटते, की त्यांच्या मुला-मुलींनी "यूपीएससी'ची परीक्षा उत्तीर्ण करून उच्चपदस्थ अधिकारी व्हावे. मात्र, त्यासाठी काही गोष्टींचे पालन करणे आवश्‍यक ठरते.

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात 12 वी ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर बहुतेक मुला-मुलींचा कल डॉक्‍टर, इंजिनियर होण्याकडे असावयाचा; परंतु मागील काही वर्षांमध्ये 12 वीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांचा कल युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन अखिल भारतीय सेवेमध्ये प्रवेश करण्याकडे दिसून येतो.

बरेचसे पालक सातवी किंवा आठवीपासूनच आपल्या मुलांना युपीएससी परीक्षेबाबत आकर्षण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. यात वावगे असे काही नाही. तथापि, अगदी सातवी किंवा आठवीपासूनच मुलांमध्ये यूपीएससी परीक्षेचा कल निर्माण करणे फारसे योग्य नाही. यासंबंधात मुला-मुलींच्या आवडी निवडीचाही विचार करणे गरजेचे आहे. कोणताही मुलगा, मुलगी सातवी किंवा आठवीमध्ये पुढील आयुष्याच्या दिशेबाबत योग्य निर्णय घेऊ शकत नाही. याकरिता विद्यार्थ्याने कमीत कमी 12 वी पावेतो शिक्षण घेणे आवश्‍यक आहे.

प्रत्येक पालकास असे वाटते की त्यांच्या मुला-मुलींनी फार मोठे व्हावे आणि त्या मुलांना यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करून जिल्हाधिकारी किंवा तत्सम पदावर काम करावे; परंतु केवळ इच्छा किंवा अपेक्षा व्यक्त करून उद्दिष्ट साध्य होत नाही. याकरिता कुटुंबात पोषक वातावरण निर्माण करणेही गरजेचे आहे. पोषक वातावरण याचा अर्थ असे वातावरण की, ज्यामुळे मुला- मुलींमध्ये निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होईल. ते भविष्यात निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या संधीचा अभ्यास करून त्याबाबत सर्वंकष विश्‍लेषण करू शकतील आणि त्यांच्या मानसिकतेस व प्रवृत्तीस पोषक अशा व्यवसायाची निवड करू शकतील. याबाबत पालकांनी आपल्या पाल्यांशी मनमोकळी चर्चा करणेही गरजेचे आहे. बहुतेक पालक आपल्या पाल्याशी मोकळ्या मनाने चर्चा करीत नाहीत. आपल्या पाल्याचे विचार समजून घेण्याचाही प्रयत्न करीत नाहीत. सुखी आणि समाधानी जीवनाकरिता अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणत्याही एका विशिष्ट व्यवसायावर अवलंबून न राहता उपलब्ध सर्व बाबींचा सखोल आणि संतुलित पद्धतीने विचार करणे गरजेचे आहे. प्रत्येक मुला-मुलींची मानसिकता, त्यांची आवड निवड आणि त्यांचे खरे बलस्थान या सर्व बाबींचा एकत्रित विचार करणे अतिशय महत्त्वाचे असते. त्यामुळे केवळ यशस्वी उमेदवारांच्या मुलाखतींच्या आधारे आपल्या पाल्यांच्या भविष्याबाबत एकतर्फी निर्णय घेणे योग्य नाही; तसेच एक प्रकारे घेतलेला निर्णय आपल्या पाल्यावर लादणे हेही योग्य नाही. जे विद्यार्थी यूपीएससीच्या परीक्षेत यशस्वी होऊ शकले नाहीत ते सुद्धा आज व्यवसायांमध्ये फार महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांना सुद्धा अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांपेक्षा किती तरी अधिक पगार मिळतो आहे; तसेच त्यांना सामाजिक मान-सन्मान सुद्धा मिळतो आहे. त्यामुळे पगार व सामाजि
क दर्जा प्राप्त करण्याकरिता फक्त यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्‍यक आहे, हा गैरसमजसुद्धा काढून टाकणे गरजेचे आहे. त्यामुळे पालकांनी जबरदस्तीने यूपीएससी परीक्षा आपल्या पाल्यावर लादू नये. अर्थात पोषक वातावरण निर्माण करून योग्य पद्धतीने सामंजश्‍याचे आणि खेळीमेळीचे वातावरणात आपल्या मुला-मुलींच्या विचारात योग्य तो बदल घडवून आणणे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे. पालकास हे शक्‍य होत नसेल तर परिचित आणि विश्‍वासातील काही व्यक्तींची मदत घेण्यास हरकत नाही.

काही पालक मुला-मुलींनी 12 वीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर यूपीएससीची तयारी करण्याकरिता आणि त्यासोबतच कला शाखेत पदवी संपादन करण्याकरिता दिल्ली किंवा इतर मोठ्या शहरात पाठवितात. दिल्लीसारख्या मोठ्या शहरात वर्षाचा खर्च रु. दोन ते तीन लाख पावेतो इतका येतो आणि तीन वर्षांकरिता मुलास दिल्ली येथे ठेवावयाचे झाल्यास पालकास सात ते आठ लाख पावेतो इतका खर्च करावा लागतो. इतके करूनही यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळेलच याची खात्री देता येऊ शकत नाही. त्यामुळे ज्या पालकांकडे भरपूर पैसा आहे, अशाच पालकांनी आपल्या पाल्यास दिल्ली किंवा इतर मोठ्या शहरात पाठवावे; परंतु ज्यांची आर्थिक परिस्थिती साधारण आहे, अशा पालकांनी मात्र चुकूनही कर्ज काढून आपल्या मुलास दिल्ली किंवा इतरत्र ठिकाणी पाठवू नये. मुलांचा निर्धार पक्का असेल आणि श्रम करण्याची मानसिक तयारी झाली असेल तर तो विद्यार्थी लहान शहरांत राहूनसुद्धा यूपीएससी परीक्षेची तयारी करू शकतो. आजच्या इंटरनेटच्या युगात सर्वच माहिती लहान शहरातसुद्धा उपलब्ध होऊ शकते. यूपीएससीचा अभ्यास करण्याकरिता राहत्या घरी स्वतंत्र खोली असणे गरजेचे आहे. घरी येणाऱ्या मित्रमंडळी आणि नातेसंबंधातील व्यक्तींमुळे मुलांच्या अभ्यासात अडथळा निर्माण होऊ शकतो. ही बाब विचारात घेता घराचे शेजारी एखादी खोली भाड्याने घेऊन त्या ठिकाणी मुलांच्या अभ्यासाची स्वतंत्र व्यवस्था केल्यास ते अधिक उपयुक्त ठरते.

समविचारी आणि समसवयीच्या 2 ते 3 मुलांनी एकत्र येऊन अभ्यास केल्यास त्याचा फायदा सर्वांनाच होतो; तसेच खोलीचे भाड्यावरील खर्चातही बचत होते. पालकांनीसुद्धा याबाबत पुढाकार घेण्याची आवश्‍यकता आहे.
केवळ कोचिंग क्‍लास लावल्यामुळे यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होता येत नाही. दृढ निर्धार आणि कठोर परिश्रमाच्याच आधारे यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळू शकते.
............................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा