शनिवार, १८ डिसेंबर, २०१०

प्रगतीच्या वाटेवर -अशीही एक आदिवासीवाडी

प्रगतीच्या वाटेवर -अशीही एक आदिवासीवाडी

आदिवासींची अतिशय चांगली घरे 
आदिवासी समाज म्हटला कि व्यसनांध ...अज्ञानी ..अंधश्रध्दाळू अशी अनेक बिरुदावली त्यांच्या मागे लावली जातात,सरकारने कितीहि योजना यांच्या्साठी राबविल्या तरी हा समाज सुधारणार नाही अशी धारणा प्रशासन आणि लोकप्रतिनिधीनीही करून घेतलेली आहे .परंतु हा समज खोटा ठरवत सर्वांपुढे आदर्श ठेवलाय तो एकलव्य आदिवासीवाडीने .


रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील लाटवण ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये ही आदिवासीवाडी येते.रायगड व रत्नागिरी जिल्ह्याच्या वेशीवर असलेल्या या एकलव्य आदिवासीवाडीने प्रगतीच्या वाटेवर आदिवासी समाजही मागे नाही हे दाखवून दिले आहे.येथिल आदिवासींची घरे ,स्त्री ,पुरुष व मुलांचे राहणीमान ,त्यांचे आर्थिक व सामाजिक योगदान, शिक्षणाविषयीची आस्था सारे काही वाखाणण्याजोगे आहे.
महाड -दापोली मार्गावर लाटवण गावाजवळ ही वाडी आहे,वाडीवर आदिवासी समाजाची २८ घरे आहेत. आदिवासींची घरे म्हणजे झोपडी ,कुडामेढीची ..परंतु .येथिल आदिवासींची घरे इतरांच्या घरांसारखी आहेत.जांभा दगड वापरून उत्तम बांधकाम केलेली घरे . दारे-खिडक्या असलेली ,स्वच्छ सारवलेली अंगणे ,अतिशय चांगली घरे या वाडीवर पहावयाला मिळतात.बहुसंख्य आदिवासीच्या घरी टि.व्ही आहेत.घरावर डिश अँटिना आहेत.फोन आहेत.बहुसंख्य आदिवासीना घरकुल योजनेचा लाभही मिळालेला आहे.सर्व गृह्पयोगी वस्तुंनी सजलेली घरे यथील आर्थिक स्तर दाखवितात .याचे मुळ कारण म्हणजे कामावलेला पैस गुंतविणे.जुनी मंडळी सोडली तर वाडीवर व्यसनाचे प्रमाण नगण्य आहे. अनेकांची बँकेत खाती आहेत,मासेमारी ,लाकूड्तोड ,बागकाम व मोलमजूरी हा त्यांचा पारंपारिक व्यवसाय त्यांनी जोपासला आहे.काही जण गवंडीकाम शिकले असल्यांने घरे बांधून देण्याची कामेही ते करतात.त्यामुळे त्यांच्या हाती पैसा आला आहे.वाडीवर दोघांकडे मोटारसायकलही आहेत.
 एकलव्य आदिवासीवाडी
एकलव्य वाडीवर आदिवासी वस्ती ७०-८० वर्षांपासून आहे.स्थानिक मंडळ घरटी २० रु.काढून बचत करतात.अडीनडीला हा पैसा वापरला जातो.वाडीवर ५० लहानमोठी मुले आहेत.परंतु सर्व शाळेत जातात.येथील शैक्षणिक स्तरही उंचावत आहे.संदीप घोगरेकर हा तरूण नुकताच डि.एड झाला आहे तर मोहन जाधव हा महाविद्यालयात शिकत आहे.अन्य मुले आश्रमशाळेत शिकतात.वाडीचा स्वतंत्र क्रिकेट संघ आहे , ४ जानेवारीला डोंगरदेवीची पूजा व उत्सव सर्व समाज एकत्र साजरा करतो.स्त्रीया पाचवारी साडी नेसतात.एका महिलेने सरपंचपदही भुषविले आहे.आदिवासीं मधील हा बदल वाखाणण्याजोगा आहे.आदिवासी समाज इतर समाजा बरोबर प्रगतीच्या वाटेवर येतोय याचे उत्तम उदाहरण म्हणून एकलव्य आदिवासीवाडीकडे पाहता येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा