शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०१०

चप्पल पुराण

     नदीचं मुळ आणि साधूच कुळ कुणी शोधू नये असं म्हणतात. मला वाटतं तसचं चपलांचा  इतिहास कुणी शोधू नये. पादुका, खडावा, चप्पल,बूट असा हा चपलेचा अनंतकाळाचा प्रवास ... गावातील एका झाडाखाली चप्पल बांधणी पासून चकाचक अशा माँल पर्यंत प्रवास करत पोहोचलेले चप्पल आणि बूट....
        चपलांच्या दुकानात गेलं कि इवलाश्या आकारा पासून अगदी फताड्या पायापर्यंत सर्वच आकारामध्ये चप्पल आणि बूट पहायला मिळतात.बूटातही नाविन्य आहेच..लेदरचे चकाकणारे बूट ते रफ अँन्ड ट्फ स्पोर्ट्स शूज पर्यंत रंगीबेरंगी बूटांचा प्रवासही वाखणण्याजोगा .माणसाच्या आयुष्यात  चप्पल आणि बूटांना तसे तुच्छ स्थान...पण खर सांगू थोडा विचार केला तर त्यांचे स्थान बहूमोल असे आहे.कपड्यानंतर माणूस सर्वाधिक काय वापरत असेल तर ती  चप्पल !. प्रत्येक सुखदु:खात , द-याखो-यात.,काट्याकुट्यात ,ऊनपावसात चप्पल आणि बूट आपल्याला साथ देतात.आणिबाणिच्या प्रसंगात उपयोगात येणारे हमखास हत्यार म्हणजे चप्पलच .
            देवाच्या दर्शनाला उभे असलो तरी आपली नजर चपलांकडे असतेचकी.चप्पल आणि बूट कुणी चोरणार नाही ना ? हा विचार मनात येतच असतो.खडाखडा बूटांचा आवाज करत चालणारे पोलिस -सैनिक पाहिले कि अंगावर रोमांच उभे राहतात.प्रभुरामचंद्र वनवासात गेल्यावर त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून भरताने राज्यकारभार केला होता.आता नेत्यांचा चपला उचलून हुजरेगिरी करून अनेक जण स्वामीनिष्ठा दाखवतांना आपण पाहतो.अंगावर चप्पल नाहितर बूट फेकून मारण्याचे नवीन फँड हल्ली जोर धरतेय. जाँर्ज बूश, पी.सी.चिदंबरम ,अडवाणी, बिहार विधानसभाध्यक्ष  , उमर अब्दुल्ला, अशोक चव्हाण यांच्यावर चप्पल-बूट फेकून मारलेली उदाहरणे आहेत.अभिनेता जितेन्द्र पासून आरोपीने न्यायाधिशाला  चप्पल-बूट फेकून मारल्याचे आपण वाचलेले आहे.त्यामुंळे सद्यस्थितीत चपलांना महत्व प्राप्त झाले.
      चप्पल ,बूट ,ज्युता ,सँन्डल ,शूज ,सभ्य भाषेत पादत्राणे तर गावरान भाषेत पायताण -वहाण असे विविध शब्दप्रयोग आपल्या वापरात कायम असतात.नोकरीसाठी मुलाखत देणा-या उमेदवाराला कपड्यांइतके चप्पल-बूटांकडेही लक्ष द्यावे लागते ,छेड काढणा-या मवाल्यांपासून दूर रहायचे असेल तर महिलांना चपलांचा कित्ती-कित्ती आधार वाटतो.मेरा ज्युता है जपानी म्हणत चप्पल सिनेमात पोहचली.बूटांवर कँमेरा मारल्या खेरीज हिरोची सिनेमात एन्ट्री कधी झालेय ?.लग्नकार्यात वराचे जोडे लपवल्या शिवाय करवलीला हक्काची कमाई कशी होणार ?.पिकपिक आवाज करणारे बूट घालून चालणा-या लहान मुलाकडे सारेच कसे प्रेमाने बघतात. टाचांच्या चपला घालून स्त्रीयाही उंच व्हायला बघतात.कोल्हापूरी चपलांचा आवाज तर भारदस्तपणा दाखवणारा.जीन्स पँन्ट्वर शोभणारे बूट तरूण तरुणींचे व्यक्तिमत्व कसे खुलवते.आपल्या सामाजिक वैयक्तिक जीवनात चपलांना कळतनकळत महत्व आलेले आहे.हे महत्व वाकप्रचार-म्हणींपर्यंत पोहचले आहे.पाहूण्याच्या बूटाने विंचू मारणे ,बापाचे जोडे मुलाला झाले कि मुलगा मोठा झाला.मुलीचे लग्न जुळवतांना जोडा झिजवावा लागतोच.पायातली वहाण पायात बरी असं म्हणत एखाद्याची लायकी काढली जाते.त्याला चपलेशी उभा करू नका..चपलेने हाणा असा शब्द रागाच्या भरात निघतो. हे सार खरं असले तरीहि रात्री-अपरात्री घराबाहेर पडतांना पायात चप्पल घालून जा रे असा वृद्ध व्यक्तिंचा हमखास सल्ला असतो. केवढा हा चपलेवर भरवसा...आपल्या सोबत असणा-या या चपलेने आपले विश्व किती व्यापलयं ना ?,
       लहाणपणी आई आणि आता पत्नी मला बजावते अरे ते बूट बदल आता किती झिजलेत ?
माझे बूट खराब झाले म्हणून मी कच-याच्या कुंडीत टाकून दिले.काही दिवसांनी माझे तेच बूट एका भिका-याच्या पायात मी पाहिले.माझी गरज संपलेले ते बूट आज कुणाची तरी गरज झाले होते.स्वत: झिजून दूस-याला सुगंध चंदन देते हे आपल्याला माहित आहे .पण स्वत: झिजून आपल्याला आनंद देणा-या चपलेच्या बाबतीत आपण सापत्नभाव ठेवतो ,आयुष्याच्या संपूर्ण प्रवासात आपल्याला साथ देणारी चप्पल आपल्या कडून  तशी दुर्लक्षित राहते.
.................................................................................

बदलत्या समाजजीवनाचा परिणाम शेतापर्यंत

आता सर्वत्र भातलावणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. बदलत्या समाजजीवनाचा परिणाम शेतापर्यंत पोहोचला असून लावणीच्या वेळी शेतात म्हटली जाणारी पारंपरिक गाणी आता दुर्मिळ झाली आहेत. नवी पिढी, शेतीची नवी साधने यामुळे भातलावणीलाही आता व्यावसायिक स्वरूप येऊ लागले आहे.

ग्रामीण भागात आजही भात हेच प्रमुख पीक आहे. पूर्वी खेडेगावात असणारी वर्दळ, मदतीला धावणारे सहकारी व सहजतेने मिळणारे शेतमजूर यामुळे शेतीची कामे झपाट्याने पूर्ण होत. गावेच्या गावे एकमेकांकडे लावणी करण्यासाठी जात होती. एकमेकांना नांगर, बैल, अवजारे दिली जात असत. आता शेतीच्या पद्धती बदलल्या आहेत. पावसाचा लहरीपणा, नव्या पिढीने शेतीकडे फिरविलेली पाठ, नोकरीनिमित्ताने शहराकडे गेलेला लोंढा यामुळे शेती करणे अवघड होऊ लागले आहे. शेतीच्या हंगामात भातलावणी हा उत्साहाचा हंगाम असे. शेतात पारंपरिक गाण्याचे सूर उमटत असत. इरले डोक्‍यावर घेतलेले, घोंगड्या अंगावर घेतलेले अनेक शेतकरी शेतात लावणीत मग्न असायचे. पेट्रोमॅक्‍सच्या उजेडात लावणी होत असल्याच्या आठवणीही येथील शेतकरी सांगतात. परंतु आता पारंपरिक गाणी दुर्मिळ झाली आहेत. नव्या पिढीला ही गाणी माहीत नाहीत.

सध्या भातलावणीसाठी मजूर आणावे लागतात. 100 ते 150 रुपये दिवसाची मजुरी असते. याशिवाय श्रमपरिहार म्हणून मांसाहारी जेवणही असते. सर्वात जास्त दर नांगराचा असतो. नांगर व बैल भाड्याने आणल्यास 250 ते 300 रुपये दिवसाचे भाडे आकारले जाते. मजुरीसाठी आदिवासी येत असल्याने या दिवसांत आदिवासी वाड्यांवर शुकशुकाट असतो. इरले-घोंगड्यांची जागा प्लॅस्टिकने घेतली आहे. शेतात बसण्यासाठी वापरली जाणारी लाकडी तिवई मात्र अजूनही आहे. तालुक्‍यात लावणीची कामे सुरू झाली आहेत. पूर्वीसारखी रंगत लावणीला येत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करतात. एक एकर शेतात लावणी करायची झाल्यास किमान 15 माणसे व चार नांगर यांची गरज असते. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला लावणीसाठी शेतक-यांची गर्दी दिसते. परंतु या शेतातून पारंपरिक गाण्यांचे स्वर मात्र कानावर पडत नाहीत. आधुनिक बियाणे, शेतीचे नवीन तंत्रज्ञान, शेती करणारी नवी पिढी, पैसे देऊन आणलेले मजूर यामुळे शेतीही आता व्यावसायिक होऊ लागली आहे.

मंगळवार, १४ सप्टेंबर, २०१०

गांधीजी भेटत गेलेले – अनिल अवचट

सौजन्य-GlobalMarathi
महात्मा गांधींकडे हे शहाणपण, वेगळेपण उपजत होतं का? की कुठला तरी साक्षात्काराचा क्षण होता? त्यांना सत्याग्रह हे तंत्र नेमकं सापडलं तरी कधी? ते नुसते गांधी नव्हते, तर भारतातल्या गरीब माणसाचं प्रतीक होते. ते सतत काही शोधत होते. या देशाला परवडेल अशा जीवनपद्धतीचा शोध घेत होते. ती आधी स्वत: जगून पाहत होते.
काय गंमत आहे, आपल्यावर कोणाकोणाचे परिणाम आहेत, हे आपल्यालाच ठाऊक नाही. मागे कुणाबरोबर ज्योतीराव फुल्यांविषयी भरभरून बोललो, तेव्हा समजलं, आपल्यासाठी ज्योतीराव काय आहेत ते. परवाही पर्यावरणवादी चळवळीत ओढला गेलेला एक तरुण पोरगा म्हणाला, ''काही म्हणा, तो म्हातारा म्हणत होता, ते बरोबर होतं.''
मी विचारलं, ‘कोण म्हातारा?’ तो हसला व म्हणाला, ''गांधीजी.''
मी थक्क झालो. तो ‘म्हातारा’ म्हणाला म्हणून नव्हे; तर त्याला गांधीजी जवळचे वाटतात, बरोबर वाटतात, म्हणून. ते जाऊनही छप्पन्न वर्षे झाली, तरी! ही काय जादू आहे? कुठेही जा; जागतिकीकरणाचा विषय असो, शेतीचा, पाण्याचा, बाजाराचा… अगदी नद्यांच्या प्रदूषणाचा; त्या त्या ठिकाणचे कार्यकर्ते चर्चा करून संपवताना म्हणतात की, कधी नव्हेत इतके गांधीजी आज रेलेव्हंट ठरले आहेत. या समस्यांचा विचार करताना त्यांनी काय म्हटले आहे, हे पाहूनच पुढे जावे लागते… वगैरे वगैरे.
एकीकडे गांधींचा खून करणा-यावर नाटकं येताहेत, काहीजण तर फाळणीचा दोष गांधीजींवरच ठेवताहेत. पाकिस्तानला पंचावन्न कोटी गांधीजींनी द्यायला लावले, हा त्यांचा गुन्हा मानतात. फाळणीच्या काळात माझ्या मामाने सांगितलेली हकिगत अशी, की एक माणूस त्याला म्हणाला, ‘गांधी कुठे आहे, बघायचेय?’ असं म्हणून त्यानं चपलेवरचा पाय उचलला, तर चपलेवर बरोबर टाचेखाली गांधीजींचा पेपरमध्ये आलेला फोटो फाडून चिकटवलेला. एका नि:शस्त्र माणसावर एवढे का चिडत होते हे लोक? त्यांचा जनमानसावर प्रभाव होता म्हणून? मग तो का होता, आणि आपल्याला का ते साधले नाही, असा विचार न करता ऐंशी वर्षांच्या नि:शस्त्र म्हाता-यावर कुणी गोळी झाडावी? माझा एक तरुण मित्र सांगत होता, त्याचे कॉलेजातले मित्र तर गांधींचा उल्लेख बुढ्ढा, टकल्या असा करतात. कोणी त्यांना हे शिकवले?
काही जणांनी गांधीजींच्या मुलाची व्यथा मांडली आहे. त्यांनी मुलांना नीट वागवले नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, इत्यादी. ते खरेच आहे. पण हे अनेक महापुरुषांबाबत झालेले दिसते. सर्व माणसे सर्वच बाबतीत बरोबर किंवा यशस्वी असतात, असं नसतं. सुभाषबाबूंच्या बाबतीतही गांधीजींचे चुकले असणे शक्य आहे. त्यांनी स्वत:च आपल्या हिमालयाएवढ्या चुका झाल्याचे लिहिले आहे. त्यांच्या दीर्घ आयुष्यात सगळेच बरोबर, योग्य असेच ते वागले, हे शक्य नाही. पण तरीही त्यातनं गांधीजी काही उतरतात का?
****
अठ्ठेचाळीस साली मी चार वर्षांचा होतो. गांधीवधानंतर उसळलेल्या दंगलीची थोडीफार आठवण आहे. ब्राह्मण मंडळी गांधीहत्येला ‘गांधीवध’ असे संबोधत असत. गावात नव्वद टक्के मराठे. माझे वडील त्यांचेच डॉक्टर. पण जमावाने आमचा दवाखाना फोडून उद्ध्वस्त केला. सकाळी मी घाबरत जरा जवळ गेलो, तर रस्ताभर केसपेपर्स. रस्ता पांढराच दिसला. त्या काळात आम्ही कोणी घराबाहेर पडत नव्हतो. घरात सर्व घाबरलेले वातावरण. कुणी कुणाशी बोलत नव्हतं. तो भीतीदायक सुन्नपणा मला अजूनही आठवतोय. नंतर जरा वाढत्या वयात कळले, की वडिलांना ठार मारायला लोक त्यांना शोधत होते. राजाराम पाटील आणि भगवंता पाटील या वडिलांच्या मित्रांनी त्यांना लपवले, म्हणून ते वाचले. नाहीतर आमचे-माझे-काय झाले असते, कोण जाणे. पुढं वातावरण निवळलं. नंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीत हा भेद बाजूला पडून गाव ढवळलं गेलं.
सावरकरांची ‘माझी जन्मठेप’ वाचलं. मेडिकल कॉलेजमध्ये मी मॅगेझिनचा संपादक होतो. पानभर सावरकरांचा फोटो छापून ते मॅगेझिन त्यांना अर्पण केलं होतं. गांधीजी दूरचे वाटत. त्यांची अहिंसा बावळटपणा वाटे. क्रांतिकारकांची चरित्रे वाचल्यावर तर हे मत पक्कं होत होतं. खेड्यातनं शहरात आल्यावर ब्राह्मण असण्याचं एकाकीपण संपलं होतं. सर्व थरांतल्या पोरांच्या दोस्त्या होत होत्या.या सगळ्यात कुठं तरी गांधीजी भेटले असावेत.
मेडिकलला आम्ही अभ्यास मंडळ काढायचं ठरवलं. लाजिरवाण्या परिस्थितीतल्या आपल्या देशाला जगात ताठ मानेनं कसं जगता येईल, यावर तावातावाने विचार करायचो. देश म्हणजे नुसता नकाशा किंवा जमिनीचा तुकडा नव्हे; तर तिथं राहणारा समाज, तिथली गरीब माणसं… या समीकरणापर्यंत आलो, म्हणून बचावलो. नाही तर आम्ही ‘जाज्वल्यराष्ट्रप्रेमी’ झालो असतो. आणि समाज बघायचा राहिलाच असता, आणि गरिबांचं खरंखुरं जीवन, त्यांचे प्रश्न तर या जन्मात दिसले नसते.
****
आमचं वर्ध्याला शिबीर होतं. इथं काही गांधीवादी लोकांची ओळख झाली. त्यातले एक आठवताहेत, ते अण्णासाहेब सहस्र बुद्धे. हिरवट घारे डोळे, टक्कल, सरळ नाक. शेती हा त्यांचा खास विषय. आम्ही त्यांच्याशी वाद घालत होतो, ‘सशस्त्र क्रांती झाली पाहिजे, त्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत.’ ते चिडून निघून जातील असं वाटलं होतं.
उलट हसून ते म्हणाले, ‘बरोबर आहे. आपण सशस्त्र क्रांती करायला माझी काही हरकत नाही. किती लोक त्याच्यासाठी तयार आहेत? किती लोक तुमच्यामागे येतील? सरकार उलथवायचे झाले, तर सैन्याचा मुकाबला कसा करणार? असं समजू की तेही आपण करू शकलो, तरी भारतातल्या लाखो गावांमध्ये जाऊन शेतीसुधारणा, जातिभेद निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन हे सर्व करायला किती कार्यकर्ते लागतील? ते कोण तयार करणार. समजा तेही झालं आणि शेतकरी या बदलांना तयार नाही झाले, तर काय? की त्यांनाही गोळ्या घालायच्या? असे किती लोकांना गोळ्या घालणार? या सगळ्यांनी आपल्याविरुद्ध उठाव केला तर?…’
बाप रे… आम्ही हा विचारच केला नव्हता. सर्व प्रश्नांची उत्तरं सशस्त्र क्रांतीतून मिळतील, असं समजत होतो; पण अण्णासाहेबांनी तो विचार फक्त शेवटपर्यंत नेऊन दाखवला आणि माझे डोळेच उघडले. मग त्यांचं म्हणणं मी लक्ष देऊन ऐकू लागलो.
वर्धा शिबिराच्या निमित्ताने पवनारला विनोबांच्या आश्रमाला आम्ही पाचएकशे तरुणांनी भेट दिली. विनोबांविषयीही मनात अढी. कधी थट्टाही करायचो. आम्ही आश्रमात गेलो तेव्हा कळले की, ‘ते मौनात आहेत. तुम्ही प्रश्न विचारा, ते पाटीवर लिहून उत्तरे देतील.’ काय बोअर प्रकार हा, असं म्हणत एका मंडपात रांग करून बसलो. हिरवी कानटोपी, पुढे थोडे हूड असलेली घालून ते आले आणि आमच्या प्रश्नोत्तरांच्या सुरुवातीलाच त्यांनी मौन सोडून उत्तरं द्यायला सुरुवात केली. तासभर ते बोलले.
मला सगळ्यात आवडली, ती त्यांची प्रसन्न सुंदर भाषा! असं सहज आणि सुंदर मराठी त्यापूर्वी ऐकलं नव्हतं. त्यांचे युक्तिवादही त्या वेळी स्फुरलेले, चपखल होते. शहरं खेड्यांचं कसं शोषण करतात, हे सांगताना म्हणाले, ‘शहरट लोक असतात ना, त्यांना सगळीकडचं उत्तम ते हवं असतं. तसे ते हावरटच,’ असं म्हणून छान, लहान मुलासारखे हसले. पुढे म्हणाले, ‘कृष्ण गवळणींना उगाच अडवीत होता का?’ मी चक्रावलोच.
‘या शहरट लोकांना खेड्यातलं सगळं हवं असतं. दूध होतं खेड्यात, पण खेड्यातल्या लोकांना प्यायला मिळत नाही. म्हणून कृष्णानं शहराकडे दूध विकायला निघालेल्या गौळणींना अडवलं…’ ही त्यांची संगती अजब होती, पण हळूहळू पटतही होती! नंतर ‘ती’गांधीजींची झोपडी बघायला गेलो. मला ती बाहेरूनपेक्षा आतूनच आठवतेय. कुडाच्या भिंती मातीनं सारवलेल्या. जमिनी शेणात सारवलेल्या. त्यांच्या बसायच्या खोलीत अंधार-प्रकाशाचा छान मेळ होता. म्हटलं तर अंधार, पण अप्रत्यक्ष प्रकाशही. या माणसाला या बाबतीतली एवढी प्रगल्भ दृष्टी होती?
पुढे काही वर्षांनी लॉरी बेकरविषयी पुस्तक वाचलं. हा सैनिक स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रह्मादेशच्या लढाईवरून घरी इंग्लंडला परत चालला होता. त्यानं पेपरमध्ये गांधींविषयी खूप वाचलं होतं. ‘हा कोण माणूस, बघूनतरी जाऊ या’ असं म्हणून गांधीजींना भेटायला गेला. गांधीजींनी त्याला विचारलं, ‘इंग्लंडला जाऊन काय करणार?’
‘मी आर्किर्टेक्ट आहे. तो व्यवसाय करीन.’
गांधीजी म्हणाले, ‘मी खरा आर्किर्टेक्ट कोणाला म्हणतो, माहीत आहे? जो 25 मैलाच्या परिघातून बांधकाम साहित्य मिळवतो तो.’
लॉरी बेकर चक्रावलाच. तो इंग्लंडला गेला. प्रॉपर्टी विकून भारतात परत आला. केरळमध्ये स्थायिक झाला आणि गांधीजींच्या व्याख्येप्रमाणे विटांचा जास्तीत जास्त वापर करून हवेशीर, सुंदर घरं बांधली. त्याला ‘ब्रिक मॅन ऑफ इंडिया’ असं संबोधतात.
गांधीजींच्या एकेका वाक्याने अनेकांनी त्यांची त्यांची आधीची जीवनं फेकून देऊन पूर्णपणं वेगळा रस्ता धरला आहे. कसा होत असेल हा बदल? त्यांच्या करिष्म्यामुळे का? मला वाटतं, त्यांच्या अल्पाक्षरी, पण जगावेगळ्या दृष्टिकोनामुळं असेल.
अभय बंग एक मोतीलाल नेहरूंची गोष्ट सांगतो. ते बडे वकील, अमीर. गांधीजींनी जाहीर केलेला दांडीचा मिठाचा सत्याग्रह त्यांना हास्यास्पद वाटला. एवढं मोठं ब्रिटिश साम्राज्य. या मूठभर मीठ सत्याग्रह करण्यानं त्यांच्यात काय फरक पडणार? त्यांनी गांधीजींना या व्यर्थपणाविषयी लांबलचक पत्र लिहिलं. गांधीजींची तार आली, ‘करके देखो.’
त्या दिवशी अलाहाबादमध्ये या सत्याग्रहाला पाठिंबा देणारी सभा होती. ‘म्हातारा म्हणतोय तर जाऊ सभेला.’ तसं जाहीर होताच सभेला जाण्यापूर्वीच त्यांना अटक करण्यात आली. त्यांनी पोलिसांना विनंती करून गांधीजींना तार केली. ‘करनेसे पहलेही देख लिया.’ जवाहरलाल, वल्लभभाई आणि कितीक गांधीजींच्या एका भेटीत पूर्ण बदलून गेल्याची उदाहरणं आहेत. काय होतं त्यांच्यात? काटकुळा, उघडा कृश देह, पडक्या दातांचं हास्य.
पडके दात वार्धक्यामुळे पडले नव्हते, तर दक्षिण आफ्रिकेत गो-यांविरुद्ध लढा उभारला असताना एका गो-या आणि एका पठाण तरुणाकडून बेदम मारहाणीत पाडले गेले होते. नंतर हे दृश्य पाहणा-या एका गो-या महिलेनं त्यांना हॉस्पिटलात दाखल केलं. तिथे हिंदी समाजाचे लोक जमले. त्या तरुणांवर पोलिस कंप्लेट करूयात, त्यांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे, असं लोक म्हणू लागताच त्याही अवस्थेत गांधीजी म्हणाले, ‘चळवळ करताना वैयक्तिक त्रास होतो. त्याबद्दल मी तक्रार करणार नाही. चळवळीत सर्वांवर होणा-या अत्याचाराची आपण जरूर दाद मागू’ म्हणून पोलिस तक्रार केली नाही. नाहीतर त्या मुलांना नक्कीच शिक्षा होऊ शकली असती. गांधीजींचं हे वेगळेपण. नंतर त्या मुलांनी येऊन गांधीजींकडे क्षमायाचना केली.
गांधीजींकडं हे शहाणपण, वेगळेपण उपजत होतं का? की कुठला तरी साक्षात्काराचा क्षण होता? त्यांना सत्याग्रह हे तंत्र कधी सापडलं?
गांधीजींचं तंत्र घडलं ते दक्षिण आफ्रिकेत. माझी समजूत ते तिथं दोन/चार वर्षं असतील एकूण. पण तिथं ते 21 वर्षं होते. तिथं ज्या खटल्यात त्यांना तिथल्या वकिलाच्या मदतीला पाठवलं होतं, तिथं दुस-या पार्टीला भेटून त्यांनी कोर्टाबाहेर तडजोड घडवून आणली. जी बाजू सत्य असेल, त्यांचेच वकीलपत्र ते घेत. त्यामुळे कमाई कमी. म्हणून गरजा कमी केल्या. जाती-धर्मांमध्ये विखुरलेल्या हिंदी समाजाला एकत्र आणून लढा उभारला. पण असं त्यांना करावंसं नेमकं कधी वाटलं?
दोन घटना फार हृद्य आहेत... नाताळला तिकीट असतानाही गो-यांनी त्यांना फर्स्ट क्लासमधून प्लॅटफॉर्मवर सामानासहित फेकून दिलं. ही घटना खूप आधीपासून माहीत होती; पण पुढचं वाचलं तेव्हा निराळा बोध झाला. रात्रीच्या वेळी, कडाक्याच्या थंडीत तिथल्या वेटिंग रूममध्ये गांधीजी रात्रभर बसून राहिले. जवळचं सामान उघडून स्वेटर, शाल, पांघरूण काढता येणं शक्य होतं; पण तसं केलं नाही. रात्रभर काय विचार केला असेल त्यांनी? कदाचित इथे अन्यायाचा प्रतिकार करण्याचा निश्चय झाला असेल. कदाचित सत्याग्रह ही कल्पनाही सुचली असेल; पण त्या रात्रीनंतर ते आमूलाग्र बदलले, हे सा-यांच्याच लक्षात आलं.
दुसरी घटना त्यानंतरची.
घोडागाडीत-व्हिक्टोरियात बसले असताना गोरा सोल्जर आला. त्यानं, मला आत बसू दे, तू घोडागाडी चालवणा-या कोचमनच्या शेजारी बस, असं सांगितलं. ते गांधींनी मान्य केलं. तसं पुढं जाऊन बसलेही. काही वेळानं गो-याला कोचमनशेजारी बसून सिगरेट पिण्याची लहर आली. तो परत गांधींना उठायला सांगू लागला. गांधींनी त्याला नकार दिला. त्यानं आणि कोचमननं गांधीजींना बडव-बडव बडवलं. गांधीजींनी बाजूची पितळी दांडी घट्ट धरून ठेवली, ती सोडली नाही. शेवटी त्या दोघांनी तो नाद सोडून दिला.
ती पकडलेली दांडी, हा सत्याग्रहाचा जन्म असावा. मी प्रतिकार करणार नाही, पण दांडीही सोडणार नाही. सविनय कायदेभंगाच्या या तंत्रापुढं नंतर ब्रिटिश साम्राज्यही डळमळलं, एवढी या साध्या सोप्या तंत्रात ताकद होती. हे तंत्र गांधीजींनी ‘थोरो’कडून घेतलं का? थोरो हा एक पिढी आधीचा. थोरोच्या मृत्यूनंतर गांधीजींचा जन्म झालाय. अमेरिकेतला तत्त्वज्ञ हेन्री डेविड थोरो याचं वॉल्डन (मराठीत दुर्गा भागवतांनी भाषांतर केलेलं ‘वॉल्डनकाठी विचार विहार’) हे पुस्तक वाचल्यावर मी कॉलेजात असताना झपाटून गेलो होतो.
शहरातील कृत्रिमतेला कंटाळून तो वॉल्डन तळ्याकाठी राहू लागला. स्वत:च्या हातानं झोपडी बनवली. तो लिहितो, ‘आपण आपलं घर बनवायचा आनंद सुताराला का देतो, हे कळत नाही.’ (खरं तर त्यालाही तो मिळत नाही) आसपासच्या जमिनीत धान्य उधळून, खतपाणी, मशागत न करता, येईल त्या धान्यावर, फळांवर गुजराण करू लागला. त्याचे निबंध वाचण्यासारखे आहेत. ‘रविवार’, ‘फिरणे’ यातच सिव्हिल डिसओबिडियन्स हाही आहे. म्हणजेच सविनय कायदेभंग. या अन्यायी सरकारला कर भरणं, म्हणजेही त्या अन्यायात सहभागी होणं; म्हणून कर भरणार नाही, अशी भूमिका घेतली आणि त्यासाठी शिक्षा भोगायला तयार आहे, असंही म्हटलं. सरकारने त्याला अल्पकाळ तुरुंगातही टाकलं. जॉन रस्किनच्या ‘अनटू दि लास्ट’या पुस्तकाप्रमाणंच थोरोविषयी त्यांनी वाचलं होतं का? माहीत नाही; पण शक्य आहे.
गांधीजींच्या साध्या राहणीची सुरुवात आफ्रिकेत झाली. ती पुढं त्यांनी आणखीनच साधी केली. ओरिसात एक दरिदी स्त्री पाहिली. तिच्यापाशी एकच पातळ विरलेलं वस्त्र होतं. त्यामुळं ती परत परत तेच घालत असे. हे पाहून गांधीजींचे मन कळवळले. त्यांनी टोपी आणि अंगरख्याचा त्याग केला आणि पंचावर राहू लागले. मग ते कुठेही असोत; कोणाला, अगदी व्हॉइसरॉयला भेटायला जायचे असो. ते नुसते गांधी नव्हते, तर भारतातल्या गरीब माणसाचं प्रतीक होते. ते सतत काही शोधत होते. या देशाला परवडेल अशा जीवनपद्धतीचा शोध घेत होते. ती आधी स्वत: जगून पाहत होते
आज ‘साधी राहणी’च्या बरोबर उलट्या दिशेने आपण चाललो आहोत. त्यातनं काय निष्पन्न होतंय? निसर्गाची भयानक लूट आणि त्यातून होणारं कायमचं नुकसान, प्रचंड कचरा निमिर्ती आणि त्यातून जीवसृष्टीला होणारा धोका, पृथ्वीचं वाढतं तापमान आणि त्यातून विरघळणारे ध्रुव आणि त्यातून पाण्याखाली जाणारी बेटं आणि बंदरं… त्यापेक्षा गांधी काय सांगत होते, ते ऐकले असते तर?
खेड्यातलं अन्न, कापूस, दूध खेड्यातच वापरा. काही गरजा शेजारच्या खेड्याकडून भागवा. गाव स्वच्छ ठेवा. मैल्यातून, शेणातून खत निर्माण करा. गायी, बैल जोपासून गोधन वाढवा. सृष्टी, प्राणी यासहित चांगले जीवन जगा… यात थट्टा करण्याजोगं काय होतं? आज कोल्हापूर भागातलं दूध टँकरमधून मुंबईला पाठवण्यात सृष्टीवर किती ताण देतोय आपण? बहुसंख्य प्रश्न शहरांच्या बेसुमार वाढीमुळंच निर्माण झाले आहेत. खेडी भकास झाली. तिथले कारागीर डुबले आणि शहरात येऊन काय मिळालं? तर झोपडपट्टी, प्रदूषित जीवन. आता तर कामगारांची गरज नसलेल्या कारखान्यांमुळं बेकारीही. परत परत गांधीजी आता अधिक बरोबर ठरताहेत.
गांधीजींकडून आणखी एक गोष्ट मला नेहमी शिकावीशी वाटते. गांधी सिनेमात एक दृश्य आहे (आणि ते अनेकांनी लिहूनही ठेवले आहे.) नेहरू, पटेल आदी मंडळींची महत्त्वाच्या विषयावर बैठक चालू असते. गांधीजी एकदम उठतात. सगळे आश्चर्यानं पाहू लागतात. ते म्हणतात, ‘माझ्या बकरीला चारा घालायची वेळ झाली.’ सगळ्यांच्या चेहे-यावर वैताग, काय हे खूळ असा भाव. मला हा प्रसंग फार ठसला. देशाचा कारभार करणं हा जसा जीवनाचा भाग आहे, तसा बकरीला चारा घालणं हाही.
दुसरा प्रसंग. मी एका डॉक्युमेंटरीत पाहिलेला. गांधीजी दिल्लीतल्या व्हॉइसरॉय हाऊसवर बोलणी करायला गेलेले. बोलणी संपवून रात्री उशिरा घरी परत निघतात. ते ‘हरिजन वस्ती’मध्ये उतरलेले. व्हॉइसरॉयनी दिलेली गाडी नाकारून शांतपणं मोकळा रस्ता चालताना दिसतात. इकडे त्या बोलण्यातून काय निष्पन्न झाले, याविषयी त्यांचे सहकारी, पत्रकार थांबलेले; पण गांधीजी काही मैल एकटे चालत गेले. ते त्या चळवळीच्या गतीच्या वावटळीत. कधी भिरभिरले नाहीत, कधी उडून गेले नाहीत. ते आपल्या गतीनं चालत राहिले. ते असामान्य असले तरी त्यांनी आपल्यातलं सामान्यत्व जपलं. म्हणून सामान्य माणसांना ते आपले वाटले असले पाहिजेत.
गांधीजींच्या चळवळीत खूप माणसे घडली. काही स्वातंत्र्य चळवळीत होती, काही विधायक, तर काही दोन्हीतही. गांधीजींनी कुणाला गोशाळा काढायला सांगितलं, तर कुणाला निसगोर्पचार आश्रम; कुणाला शौचालयावर संशोधन, तर आणखी कुणाला आणखी काही आणि ही माणसं बिनतक्रार आयुष्यभर त्या कामात राहिली. त्या माणसांचीही आपापली वैशिष्ट्ये सांभाळून. कुडाळचे अप्पा पटवर्धन हे असेच विलक्षण व्यक्तित्व. त्यांचं ‘माझी जीवनयात्रा’ हे आत्मचरित्र वाचलं आणि चकित झालो. तुरुंगात त्यांनी भंगीकाम पाहिलं. स्वत: करायची तयारी दाखवली; पण तुरुंगाधिका-यानं परवानगी दिली नाही. कुडाळमध्ये परत आल्यावर बादली- खराटा घेऊन सक्काळी भंग्यांमध्ये (आता आपण त्यांना मेहतर म्हणतो) मिसळले. पुढं त्यांनी अनेक प्रयोग केले. चराचे संडास, सोपा संडास… इ. आज बिंदेश्वरी पाठकांनी भारतभर बांधलेली सुलभ शौचालये हा अप्पांचा सोपा संडासचीच जवळची आवृत्ती.
नाशिकजवळ गंगापूरला भाऊ नावरेकरांनी हेच काम पुढं चालू ठेवलं. आता त्यांची मुलं काम करीत आहेत. त्यांनी बायोगॅसचा सुटसुटीत प्लँट तयार केला आहे आणि जागोजाग जाऊन तो ते करून देतात. तोडणकर गुरुजीही असेच संडास या समस्येला वाहिलेले. संडास ही काय प्रतिष्ठितपणं उच्चारायची गोष्ट झाली? त्याकडं डोळेझाक करीतच आपण ती समस्या आणखी वाढवून ठेवली आहे.
खेड्यापाड्यात स्त्रियांनी पहाटे किंवा रात्री उशिरा गटानं जाऊन बाहेर रस्त्याकडेला बसावं आणि गाडीचा प्रकाश पडला की उभं रहावं… किती लाजिरवाणी अवस्था. शेतं गावाला खेटायला आली आणि अशा जागा नष्ट झाल्या. शहरात त्यापेक्षा वाईट अवस्था. मागे पंचगंगा या कोल्हापूरच्या नदीची पाहणी केली होती. गावातलं बहुतेक सर्व ड्रेनेज कुठल्याही प्रक्रियेशिवाय पंचगंगेत सोडलेलं. पुढची गावं तेच पाणी पितात. आज बहुतेक सगळ्या नद्यांची गटारं करून टाकलीत आम्ही. मैला हे उत्तम खत देतं, स्वयंपाकाला इंधन देतं. ते न घेता त्याची महाभयानक समस्या करून बसलोय. गांधींची थट्टा करू शकता; पण मग या समस्याही सोडवून दाखवाव्यात.
मी ‘साधना’ साप्ताहिकात काम करताना अनेक गांधी परंपरेतल्या लोकांशी संबंध आला. आचार्य भागवत यायचे. ते गेल्यावर मी त्यांच्यावर विशेषांक काढला होता. दादा धर्माधिकारींशीही स्नेह जमला. त्यांचे व्यवस्थित, पूर्वग्रहविरहित विचार मला फार आवडायचे. ‘स्त्री-मुक्ती’वरचे त्या वृद्धाचे विचार इतके पुढचे, की आम्हालाही न झेपणारे. बाबा आमट्यांच्या ‘ज्वाला आणि फुले’, ‘वर्कर्स युनिव्हसिर्टी’ या पुस्तकांनी असेच भारलेले. सोमनाथ शिबिरात एका सर्वोदयी वृद्धानं मला वळकटी बांधायला शिकवलं होतं. त्यांची पांढरट जाड सतरंजी गुंडाळलेली ती खास सर्वोदयी गठडी होती. कुणी माणसं शिक्षणक्षेत्रात होती. ‘नई तालीम’ ही वर्ध्याची शाळा म्हणजे मुक्तशिक्षणाची आद्य शाळाच.
गांधी परंपरेतला फसलेला प्रयोग म्हणजे भूदान, असं मी समजायचो. विनोबांची यात्रा पुढं गेली की, दान केलेली जमीन मालक परत घ्यायचे… वगैरे. पुण्याला धनंजयराव गाडगीळांचे भाषण होते. ते मार्क्स प्रवाहातले अर्थशास्त्रज्ञ समजले जात. ते केंद्र सरकारात प्लॅनिंग कमिशनचे अध्यक्षही होते. ते म्हणाले, ‘भारतातल्या समस्या सोडवण्यासाठी आपण जगाकडं पाहतो. साम्यवाद, समाजवाद असे काही मार्ग आहेत. भारतीय परिस्थितीवर भारतातून निघालेले एकमेव उत्तर म्हणजे भूदान चळवळ होय. ती भले अयशस्वी ठरेना का; पण जगाला आर्थिक प्रश्नावरचा भारतातून पुढं अलेला हा एकमेव उपाय आहे.’ तेव्हा मी चमकलोच होतो.
मी साधनेचा संपादक असताना स्वातंत्र्य मिळून 25 वर्षं पूर्ण झाली होती. सगळीकडे 25 वर्षांत आम्ही काय मिळवलं, तर भाक्रानान्गलसारखी धरणं, भिलाईवगैरे कारखाने असे फोटो येत. गांधीजींचं एक वाक्य मी वाचलं होतं, ‘देशाच्या प्रगतीचा निकष एकच, की ती प्रगती शेवटच्या माणसापर्यंत पोहोचली आहे की नाही, हा!’ त्याला ते अंत्योदय म्हणत. म्हणून मी तो विशेषांक दलितांनीच लिहावा, त्यांना या देशाविषयी काय वाटतं हे त्यांनी निर्भयपणं लिहावं, असं आवाहन करून तो अंक छापला; पण ते कटू सत्य कित्येकांना पचलं नाही आणि गदारोळ झाला. अंकाचं दहन झालं. माझी आणि यदुनाथजींची प्रेतयात्रा काढून त्याचंही दहन झालं. (माझ्या प्रेतयात्रेबरोबर मीही चालत होतो!)
आजवरच्या वर्गाची, उच्च मध्यमवर्गाची स्थिती सुधारतेय. त्यांच्या आकर्षक कॉलनीज्, त्यांच्यासाठी उत्तम शाळा, भव्य हॉटेल-रेस्टारंट्स उभी रहात आहेत. त्याला आम्ही प्रगती समजतोय; पण खाली गाडली गेलेली, चेपली गेलेली माणसं? कर्जबाजारी शेतक-यांचे गळफास! आपण खालच्या माणसापासून सुरुवात केली असती, तर एवढी झकपक नसती दिसली; पण माणसं चार घास सुखानं खाऊ शकली असती. गांधीजींचा आधुनिकतेला विरोध नव्हता; पण माणसांना सुखी करणारा समाज महत्त्वाचा. त्याला अनुरूप आधुनिकता त्यांना मान्य होती. आजची कामगारविरहित कारखानदारी त्यांनी कधीच मान्य केली नसती. शूमाकरचं ‘स्मॉल इज ब्यूटिफूल’ इथं आठवलं. गांधीजींचा अवाढव्यतेला विरोध होता; कारण त्याखाली सर्वसामान्य माणसं चिरडून जातात म्हणून.
काही वेळा चर्चा सुरू होते, की ‘स्वातंत्र्य कोणी मिळवलं?’ मला वाटतं, अनेकांनी. 1857च्या लढ्यापासून तो गांधीप्रणीत चळवळीपर्यंत. पण भारतातल्या सर्वसामान्य माणसांपर्यंत स्वातंत्र्याची इच्छा कोणी निर्माण केली, या प्रश्नाला मात्र एकच उत्तर मी देईन, गांधीजी. भारतव्यापी, सर्व थरांमध्ये प्रभाव टाकलेली ही एकच व्यक्ती. बाकीच्यांची वर्तुळं लहान आहेत.
गांधीजींचा प्रभाव जगावर होता, हे 2000 साली ‘मिलेनियम’वर प्रभाव टाकणा-या व्यक्तीची निवड सुरू झाल्यावर कळलं. लेखक, नेते, शास्त्रज्ञ, कलावंत सगळी नावं मागं पडली, आणि दोन उरली. एक आइनस्टाईन आणि दुसरे गांधीजी. त्यात आइनस्टाईनला जास्त मतं पडली आणि ते सर्वात प्रभाव पाडणारी व्यक्ती ठरले. पण गांधीहत्या झाल्यावर आइनस्टाईन काय म्हणाला होता, माहीत आहे? तो म्हणाला की, ‘गांधींसारखी महान व्यक्ती कधी काळी जन्मली होती आणि या भूतलावर चालली होती, हे पुढच्या पिढ्यांना खरं वाटणार नाही.’ (लॉर्ड माऊंटबॅटन हे शेवटचे व्हाइसरॉय आणि ब्रिटिश राजघराण्यातील. त्यांनी म्हटलं आहे, ‘इतिहासाच्या पानावर गांधीजींचं नाव ख्रिस्त आणि बुद्ध यांच्याबरोबरीनं लिहिलं जाईल.)
माटिर्न ल्यूथर किंग या कृष्णवणिर्यांच्या नेत्याचं चरित्र वाचताना त्यानं गांधीजींविषयी जागोजाग कृतज्ञता व्यक्त केल्याचं दिसलं. पुस्तकाच्या फोटो विभागात त्याच्या खोलीत त्याच्या मागे गांधीजींचा फोटो लावलेला होता. अमेरिकेसारख्या पिस्तुलगच्च देशात, त्यातही कृष्णवर्णीय समाजात अहिंसक चळवळ रुजवण्याचं काम तो करू शकला, हे गांधी-विचाराचं यश. कॅलिफोर्नियामध्ये असलेल्या मेक्सिकन मजुरांचा नेता सीझर शॅवेझ असाच. अहिंसक चळवळी तर करायचाच; पण प्रश्न तडीला लावण्यासाठी गांधीजींसारखी वीस-वीस दिवसांची उपोषणे करायचा. त्याच्याही खोलीत गांधीजींचा फोटो. माटिर्न ल्यूथर किंग आणि सीझर शॅवेझ यांचा प्रभाव इतर हिंसक चळवळींपेक्षा जास्त टिकून राहिलाय आणि त्यांनी मनं जोडण्याचं अपूर्व काम केलंय.
मधू लिमयांबरोबर उत्तर प्रदेशात प्रवास करताना त्यांच्याशी खूप गप्पा व्हायच्या. गांधीहत्या झाली, तेव्हा ते दूर युरोपातल्या कुठल्या छोट्या देशात होते. रेडिओवर ही बातमी ऐकून विमनस्क होऊन रस्तोरस्ती भटकत होते. एका प्रौढ माणसानं त्यांना थांबवलं. विचारलं, ‘तुम्ही भारतीय का?’ हे ‘हो’म्हणताच त्या गृहस्थांनी यांचे खांदे गदा गदा हवलत म्हटलं, ‘व्हाय डिड यू किल् गांधी? तुम्ही काय समजता, गांधी काय फक्त तुमचेच होते?’
हे ऐकून मी शहारलोच. त्या जगाच्या पाठीवरच्या कुठल्या देशातल्या माणसाला गांधीजी ‘त्याचे’ वाटावेत आणि आम्ही त्यांना ओळखू नये?
आणखी एका गोष्टीचं मला प्रचंड आश्चर्य वाटतं. इतक्या वर्षांच्या अविश्रांत लढ्यानंतर, अनेकदा भोगलेल्या तुरुंगवासानंतर स्वराज्य मिळालं. अशा कार्यक्रमाचे नायक कोण असायला हवे होते? तर गांधीजी; पण त्यांना नोआखालीत उसळलेल्या दंगली शांत करण्याचं काम महत्त्वाचं वाटलं आणि या सोनेरी क्षणाकडं त्यांनी पाठ फिरवली. आज काहीजण फाळणीला गांधीजींना जबाबदार धरतात. हेही जगातलं महान आश्चर्यच मानायला हवं. त्यांनी फाळणी होऊ नये, म्हणून जिवाचं रान केलं; पण शेवटी त्यांच्या शिष्यांनी- पंडित नेहरू आणि लोहपुरुष वल्लभभाई पटेलांनी- गांधीजींना बाजूला सारून फाळणी मान्य केली.
पंचावन्न कोटींबाबतही तसेच. त्या करारात भारताने ते द्यायचे मान्य केले होते. तर ते वचन आहे, आणि ते पाळा, असे गांधींनी म्हटले; तर ते फाळणीचे गुन्हेगार ठरतात! दंगलीचे डोंब उसळलेले असताना, सर्वत्र लाल कारंजी उडत असताना गांधीजी एकटेच असे की जे तिथे जाऊ शकले आणि त्यांचे आतले बळही असे, की त्यांच्या अस्तित्वाने दोन-तीन दिवसांत दंगल शांत झाली. ज्यावेळी त्यांचे शिष्य स्वराज्यातले पहिले झेंडावंदन करीत होते, त्यावेळी गांधीजी सामान्यांचे अश्रू पुसत होते. त्यांना स्वराज्यापेक्षाही माणुसकीचा धर्म मोठा वाटत होता.
माझ्यावर गांधीजींचे वेगळेच उपकार आहेत. त्यांची ‘आत्मकथा’ वाचताना लहानपणी त्यांनी सोन्याच्या कड्याचा तुकडा चोरून विकला होता. बाहेर मांसाहारही केला होता. मीही लहानपणी घरातल्या कपाटातल्या काही नाण्यांच्या चो-या केल्या आहेत. त्याची खंत अजूनही वाटत असते. त्यातून सिगारेट ओढायला शिकलो. पुढं ते सगळं वाहून गेलं, म्हणून योगायोगाने वाचलो. गांधीजींना चोरी केल्याचा पश्चाताप झाला आणि स्वत: होऊन वडिलांपाशी जाऊन गुन्हा कबूल केला तो त्यांच्या आणि वडिलांच्या अश्रूत वाहून गेला. हे वाचून मी शहारलो.
गांधी आपल्यासारखेच चुका करणारे होते; पण मग ते ‘गांधीजी’ कसे झाले? तर स्वत:मधल्या चुकांकडे स्वत:च परखडपणे पाहाणं, आणि दुरुस्त करायचा प्रयत्न करणं, ही स्वत:स सतत शुद्ध ठेवण्याची प्रक्रिया त्यांनी लहानपणापासून चालू ठेवली. म्हणून ते विश्वव्यापी झाले. आपण तसे करू या का? त्या काळात मी धार्मिक मार्गात होतो. ध्यान करायचो. निर्विचार होण्याची वाट पाहण्यापेक्षा मी दिवस समोर आणू लागलो. मला काही गांधीजी व्हायचे नव्हते. फक्त कालच्यापेक्षा आज चांगला माणूस व्हायचं होतं.
हे जेव्हा सुरू केलं, तेव्हा लक्षात आलं, की आपण दिवसाकाठी ब-याच चुका करतोय. माझ्यामधल्या अहंकाराचं तर कधी कावेबाजपणाचं, कधी उथळपणाचं, तर कधी इतरांवर इंप्रेशन मारणा-या स्वभावाचं दर्शन होऊ लागलं. ज्या व्यक्तींना माझ्याकडनं त्रास झाला असेल, तर नंतर त्याच्याकडे जाऊन कधी माफी मागू लागलो, तर कधी खंत व्यक्त करू लागलो. काही चुका परत परत होताना दिसत. त्या मी ओलांडू शकत नसे; पण त्या चुका आहेत, एवढं तरी मनाला जाणवू लागलं. या प्रक्रियेत अध्यात्म सुटलंच. काय करायचाय मोक्ष आणि जन्म-मरणाच्या फे-यातून सुटका? त्यापेक्षा चांगला माणूस किंवा चांगला होऊ इच्छिणारा माणूस म्हणून जगूयात की.
मग हा अनुभव मी इतरांना सांगू लागलो. यासाठी ज्ञानाची, शिक्षणाची, साधनेची काही गरज नाही. प्रत्येक माणूस हे करू शकतो. कधी ना कधी चांगल्या माणसांचा समाज निर्माण होईलही. हे गांधीजींचं माझ्यावरचं ऋण.
या वर्षातच मला वर्ध्याला जाण्याचा योग आला. तिथल्या विभा गुप्ताने ‘ग्रामीण तंत्रज्ञान परिषद’ आयोजित केली होती. तिथे जुने गांधीवादी भेटले, तसेच आज खेड्यापाड्यात काम करणारे तरुणही. कोणी बांबू हा विषय घेतलाय, तर कोणी संडास; कोणी शेतीमधले प्रयोग करतंय, तर कोणी तलम खादी काढायचा ध्यास घेतलाय. कुणी जुन्याचं उत्खनन करतोय, तर कोणी जुन्या नव्याचा मेळ घालत बसलाय… असा सगळा पागलखाना.
दांडीयात्रेच्या समाप्तीचा तो दिवस. म्हणून आम्हाला सेवाग्राम मधल्या ‘बापू कुटी’ला सक्काळीच नेणार होते. त्यामुळे मी आनंदून गेलो होतो. किती वर्षांनी परत बघणार ती कुटी. माझं इंप्रेशन तसंच रहावं, निदान कमी तरी होऊ नये, असं वाटत होतं.
पण त्या परिसरात पाऊल टाकल्यावर मन प्रसन्न झालं, ते अखेरपर्यंत. झाडं-झाडं बरीच आणि मधे मधे बरीच कौलारू, मातीची टुमदार घरं. वर नळीची कौलं. सारवलेल्या मातीचा छान, डोळ्यांना त्रास न देणारा रंग. बाहेर व्हरांडे. त्याला जे खांब उभे केले, ते कुठेही न आकार दिलेले वासे. लाकूड कामास तेलाचा काळा रंग; मातीच्या रंगाला किंचित उठाव देणारा.
मोकळ्या परिसरात आम्हा सगळ्यांना बसवलं. आश्रमातल्या लोकांमागोमाग आम्ही ‘आश्रम भजनावली’ तल्या प्रार्थना म्हटल्या. तो काळ हळूहळू अंगावर चढू लागला. काय असेल त्यावेळी इथं वातारण. नेहरू, पटेल, आजाद, गफारखान… अशी माणसं इथं कितीदा आली असतील आणि अशीच इथं वावरली असतील. प्रार्थनेलाही बसली असतील. इथल्या प्रत्येक सामान्य माणसामध्ये एका ध्येयामुळं असामान्यत्व संचारलं असेल. चढाओढ असलीच तर ती त्यागाची. समर्पणाला सीमाच नसेल आणि या सगळ्यामागं एक जादूभरलं व्यक्तित्व असेल, गांधीजी.
प्रार्थना संपल्यावर सगळे पांगले. मी बापू-कुटीकडे निघालो. यावेळी आणखी वैशिष्ट्यं जाणवली. आपल्या भिंतीकुडाच्या, मातीने सावरलेल्या होत्या आणि त्या वरून मोकळ्या ठेवल्या होत्या. त्यामुळं सगळं घर वरून एकमेकांशी जोडलं गेलेलं. खालीही तसंच. कुठे सहसा दारं नाहीत. होते ते फक्त आडोसे. अप्रत्यक्ष प्रकाश सर्वत्र झिरपत होता.
गांधीजी बसत, तिथं पुढं डेस्क आणि मागे टेकायला जरा उभा उंच पाट होता. मला खरं तर अशा गोष्टीचं फार अगत्य नाही. परदेश प्रवासात पूर्वीच्या मोठ्या लेखकांची, नेत्यांची घरं दाखवत. ते कुठं बसत, कुठं झोपत, कुठं लिहीत… असं दाखवायचे. वाटायचं, असतील; पण ते नाहीत, तर त्या वस्तूंचं काय एवढं? बाहेर व्हरांड्यात आलो. एका खांबाला टेकून बसलो. बाकीचे माझे मित्र त्या परिसरात हिंडत होते. याही कुटीत कुणी मधूनच येऊन जात होतं. मी बसलो त्या आडोशाआडच गांधीजींची ती बसायची जागा होती.
पिशवीतून कार्ड काढलं, आणि त्यावर पेन्सिलनं कसलं तरी चित्र काढू लागलो. मनातलं झाड हळूहळू वर येत होतं. भोवतीचा विसर पडला. एकदम समोर लक्ष गेलं. गांधीजींची जागा दिसली. भास झाला, की गांधीजी तिथं बसले आहेत आणि हसून मला येण्याची खूण करत आहेत. मला गंमत वाटली. या भासाला मी आपण होऊन चालना दिली. काय होईल पुढं? गांधीजी माझं चित्र पाहतील आणि हसतील छान.
................................................................

शुक्रवार, १० सप्टेंबर, २०१०

यूपीएससी परीक्षा अन्‌ पालकांची भूमिका

( सौजन्य- ई-सकाळ)
कृष्णा भोगे, कार्याध्यक्ष, राज्य मानव विकास मिशन

आपल्या मुला-मुलींनी जीवनात फार मोठे व्हावे, समाजात त्यांना मान सन्मान मिळावा आणि सुखी जीवन जगा, अशा प्रकारची इच्छा जवळजवळ सर्वच पालकांची असते. त्यामुळे सर्वच पालकांना असे वाटते, की त्यांच्या मुला-मुलींनी "यूपीएससी'ची परीक्षा उत्तीर्ण करून उच्चपदस्थ अधिकारी व्हावे. मात्र, त्यासाठी काही गोष्टींचे पालन करणे आवश्‍यक ठरते.

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात 12 वी ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर बहुतेक मुला-मुलींचा कल डॉक्‍टर, इंजिनियर होण्याकडे असावयाचा; परंतु मागील काही वर्षांमध्ये 12 वीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांचा कल युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन अखिल भारतीय सेवेमध्ये प्रवेश करण्याकडे दिसून येतो.

बरेचसे पालक सातवी किंवा आठवीपासूनच आपल्या मुलांना युपीएससी परीक्षेबाबत आकर्षण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. यात वावगे असे काही नाही. तथापि, अगदी सातवी किंवा आठवीपासूनच मुलांमध्ये यूपीएससी परीक्षेचा कल निर्माण करणे फारसे योग्य नाही. यासंबंधात मुला-मुलींच्या आवडी निवडीचाही विचार करणे गरजेचे आहे. कोणताही मुलगा, मुलगी सातवी किंवा आठवीमध्ये पुढील आयुष्याच्या दिशेबाबत योग्य निर्णय घेऊ शकत नाही. याकरिता विद्यार्थ्याने कमीत कमी 12 वी पावेतो शिक्षण घेणे आवश्‍यक आहे.

प्रत्येक पालकास असे वाटते की त्यांच्या मुला-मुलींनी फार मोठे व्हावे आणि त्या मुलांना यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करून जिल्हाधिकारी किंवा तत्सम पदावर काम करावे; परंतु केवळ इच्छा किंवा अपेक्षा व्यक्त करून उद्दिष्ट साध्य होत नाही. याकरिता कुटुंबात पोषक वातावरण निर्माण करणेही गरजेचे आहे. पोषक वातावरण याचा अर्थ असे वातावरण की, ज्यामुळे मुला- मुलींमध्ये निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होईल. ते भविष्यात निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या संधीचा अभ्यास करून त्याबाबत सर्वंकष विश्‍लेषण करू शकतील आणि त्यांच्या मानसिकतेस व प्रवृत्तीस पोषक अशा व्यवसायाची निवड करू शकतील. याबाबत पालकांनी आपल्या पाल्यांशी मनमोकळी चर्चा करणेही गरजेचे आहे. बहुतेक पालक आपल्या पाल्याशी मोकळ्या मनाने चर्चा करीत नाहीत. आपल्या पाल्याचे विचार समजून घेण्याचाही प्रयत्न करीत नाहीत. सुखी आणि समाधानी जीवनाकरिता अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणत्याही एका विशिष्ट व्यवसायावर अवलंबून न राहता उपलब्ध सर्व बाबींचा सखोल आणि संतुलित पद्धतीने विचार करणे गरजेचे आहे. प्रत्येक मुला-मुलींची मानसिकता, त्यांची आवड निवड आणि त्यांचे खरे बलस्थान या सर्व बाबींचा एकत्रित विचार करणे अतिशय महत्त्वाचे असते. त्यामुळे केवळ यशस्वी उमेदवारांच्या मुलाखतींच्या आधारे आपल्या पाल्यांच्या भविष्याबाबत एकतर्फी निर्णय घेणे योग्य नाही; तसेच एक प्रकारे घेतलेला निर्णय आपल्या पाल्यावर लादणे हेही योग्य नाही. जे विद्यार्थी यूपीएससीच्या परीक्षेत यशस्वी होऊ शकले नाहीत ते सुद्धा आज व्यवसायांमध्ये फार महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांना सुद्धा अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांपेक्षा किती तरी अधिक पगार मिळतो आहे; तसेच त्यांना सामाजिक मान-सन्मान सुद्धा मिळतो आहे. त्यामुळे पगार व सामाजि
क दर्जा प्राप्त करण्याकरिता फक्त यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्‍यक आहे, हा गैरसमजसुद्धा काढून टाकणे गरजेचे आहे. त्यामुळे पालकांनी जबरदस्तीने यूपीएससी परीक्षा आपल्या पाल्यावर लादू नये. अर्थात पोषक वातावरण निर्माण करून योग्य पद्धतीने सामंजश्‍याचे आणि खेळीमेळीचे वातावरणात आपल्या मुला-मुलींच्या विचारात योग्य तो बदल घडवून आणणे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे. पालकास हे शक्‍य होत नसेल तर परिचित आणि विश्‍वासातील काही व्यक्तींची मदत घेण्यास हरकत नाही.

काही पालक मुला-मुलींनी 12 वीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर यूपीएससीची तयारी करण्याकरिता आणि त्यासोबतच कला शाखेत पदवी संपादन करण्याकरिता दिल्ली किंवा इतर मोठ्या शहरात पाठवितात. दिल्लीसारख्या मोठ्या शहरात वर्षाचा खर्च रु. दोन ते तीन लाख पावेतो इतका येतो आणि तीन वर्षांकरिता मुलास दिल्ली येथे ठेवावयाचे झाल्यास पालकास सात ते आठ लाख पावेतो इतका खर्च करावा लागतो. इतके करूनही यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळेलच याची खात्री देता येऊ शकत नाही. त्यामुळे ज्या पालकांकडे भरपूर पैसा आहे, अशाच पालकांनी आपल्या पाल्यास दिल्ली किंवा इतर मोठ्या शहरात पाठवावे; परंतु ज्यांची आर्थिक परिस्थिती साधारण आहे, अशा पालकांनी मात्र चुकूनही कर्ज काढून आपल्या मुलास दिल्ली किंवा इतरत्र ठिकाणी पाठवू नये. मुलांचा निर्धार पक्का असेल आणि श्रम करण्याची मानसिक तयारी झाली असेल तर तो विद्यार्थी लहान शहरांत राहूनसुद्धा यूपीएससी परीक्षेची तयारी करू शकतो. आजच्या इंटरनेटच्या युगात सर्वच माहिती लहान शहरातसुद्धा उपलब्ध होऊ शकते. यूपीएससीचा अभ्यास करण्याकरिता राहत्या घरी स्वतंत्र खोली असणे गरजेचे आहे. घरी येणाऱ्या मित्रमंडळी आणि नातेसंबंधातील व्यक्तींमुळे मुलांच्या अभ्यासात अडथळा निर्माण होऊ शकतो. ही बाब विचारात घेता घराचे शेजारी एखादी खोली भाड्याने घेऊन त्या ठिकाणी मुलांच्या अभ्यासाची स्वतंत्र व्यवस्था केल्यास ते अधिक उपयुक्त ठरते.

समविचारी आणि समसवयीच्या 2 ते 3 मुलांनी एकत्र येऊन अभ्यास केल्यास त्याचा फायदा सर्वांनाच होतो; तसेच खोलीचे भाड्यावरील खर्चातही बचत होते. पालकांनीसुद्धा याबाबत पुढाकार घेण्याची आवश्‍यकता आहे.
केवळ कोचिंग क्‍लास लावल्यामुळे यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होता येत नाही. दृढ निर्धार आणि कठोर परिश्रमाच्याच आधारे यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळू शकते.
............................

गुरुवार, ९ सप्टेंबर, २०१०

शाळेतील खिचडी "बिरबलाची खिचडी'


विद्यार्थ्यांची गळती थांबावी आणि दुपारच्या वेळेत विद्यार्थ्यांना पुरेसे उष्मांक असलेले अन्न मिळावे, या उद्देशाने सरकारने शालेय पोषण आहार योजना प्रत्येक शाळेत सुरू केली आहे. या पोषण आहार योजनेत या वर्षीपासून बदल केल्याने ग्रामीण भागामध्ये मुलांना पोषण आहार देणे शिक्षक व ग्रामस्थांना मोठी डोकेदुखी ठरणार आहे. सरकारच्या या बदललेल्या योजनेत अनेक त्रुटी असल्याने खिचडी शिजवण्यास ग्रामस्थांमध्ये नकारात्मक सूर दिसत आहे.
राज्यातील प्राथमिक शाळा व अनुदानित खासगी शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना सुरू केली आहे. यापूर्वी रास्त भाव धान्य दुकानातून तांदूळ शाळेत नेऊन तेथे खिचडी शिजवून विद्यार्थ्यांना दिली जात होती. या वर्षीपासून योजनेत बदल करण्यात आला . नवीन योजनेत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी 450 उष्मांक व 12 प्रथिने तसेच चौथी ते सातवीसाठी 700 उष्मांक व 20 ग्रॅम प्रथिने असा आहार दिला जाणार आहे. धान्यांचा पुरवठा कंत्राटदारांकडून थेट शाळेला केला जाणार असून तांदूळ, बेसन, कडधान्य, तेल, सोयाबीन, हळद, तिखट इत्यादी सर्व सामान शाळेत दिले जाणार आहे. दररोज उष्मांकांच्या तुलनेत शाळेने विद्यार्थ्यांना हा आहार शिजवून द्यायचा आहे. एका विद्यार्थ्यासाठी 5 ग्रॅम तेल, 14 ग्रॅम कडधान्य, 15 ग्रॅम सोयाबीन,24 ग्रॅम बेसन असा विचित्र तक्ता तयार करण्यात आला आहे, त्यामुळे या तक्‍त्यानुसार आहार कसा तयार करायचा हा मोठा प्रश्‍न आहे.
शाळेतील पटसंख्येनुसार ठेकेदाराकडून शाळेत धान्य उतरून घेताना त्याचे वजन कसे करणार असा प्रश्‍न आहे. वजन करण्यासाठी सर्व शाळांना वजनकाटा पाहिजे; मात्र कोणत्याही शाळेकडे तो नाही. मुलांना पुरविलेले धान्य, वापरलेले धान्य आणि साठा याची सांगड घालताना शिक्षकांची त्रेधा उडणार आहे. हे धान्य शिजवून देण्यासाठी बचत गट, मंडळे, गरीब महिला यांना प्राधान्य द्यावे, असे सरकारचे म्हणणे आहे.कोकणातील अनेक शाळांचा पट 10 ते 20 च्या आतमध्ये आहे. 100 हून अधिक पटसंख्या असणा-या शाळा खूपच कमी आहेत. एखाद्या शाळेची पटसंख्या 10 असेल, तर तेथे इंधन खर्च प्रतिविद्यार्थी 50 पैसे याप्रमाणे पाच रुपये मिळेल. केवळ पाच रुपयांसाठी धान्य शिजविण्याचे काम कोण करणार? शिजविण्यासाठी अनुदान नसल्याने धान्य शिजवणे डोकेदुखी ठरणार आहे. प्रत्येक शाळेत धान्यपुरवठा करणा-याने वेळेत धान्य पोहोचवायचे आहे. अनेक शाळा वाडीवाडीवर व डोंगरात विखुरल्या आहेत. काही शाळांपर्यंत रस्ते नाहीत. अत्यंत दुर्गम भागातील शाळांमध्ये पुरवठादार वेळेत धान्य कसा पोहोचवणार हा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशा अनेक अडचणीत ही योजना सापडली आहे. सरकारी दुकानदारांकडून पुरवठा काढून घेऊन खासगी पुरवठादारांना धान्य शाळेत पोहोचवण्यास दिले जाणार असल्याने धान्यपुरवठादारांना भ्रष्टाचाराचे कुरणच मिळण्याची शक्‍यता पालकांनी व्यक्त केली आहे. डाळीमध्ये मसूरडाळ अथवा मुगडाळ असा पर्याय पुरवठा करताना ठेवला आहे. आज या दोन्ही डाळींच्या दरात मोठी तफावत आहे. तेलपुरवठा कोणता करायचा यामध्ये एकमत नाही... तिखट, मीठ, हळद, बेसण हे कोणते असावे याबाबतही खुलासा नाही,त्यामुळे या योजनेत भ्रष्टाचार होण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे पिठले आणि सोयाबीन हे मुलांना न आवडणारे पदार्थ आवर्जून ठेवलेले आहेत .कांदा फोडणी साहित्य नसल्यांने बेचव अन्न मुले खात आहेत.धान्य साठवणूक करण्यासाठी शाळांकडे पिम्प व इतर सोय नाही. मुलांना विशिष्ट उष्मांक मिळावेत एवढाच या योजनेचा हेतू असेल तर एखाद्या चांगल्या कंपनीला पौष्टीक बिस्किट अथवा तत्सम पाकिटे पुरविण्याचे काम देऊन हि योजना सोपी का केली जात नाही. सरकारच्या या बदललेल्या योजनेत अनेक त्रुटी असल्याने शाळेतील खिचडी "बिरबलाची खिचडी' ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.

मंगळवार, ७ सप्टेंबर, २०१०

आता एम.डी कसा होणार ?

खूप दिवसांनी डाँ.श्री व.सौ.करंदीकर यांना परदेशात जाण्याचा योग आला.परदेश टूर महिनाभराची असल्यांने आपल्या उत्तम चालणा-या हाँस्पिटलची जबाबदारी त्यांनी आपल्या नुकत्याच एम.बी.बी.एस. झालेल्या मुलाकडे दिली.आणि करंदीकर दांपत्य परदेश टूरवर निघून गेले.
महिनाभराची टूर आटोपून डाँ.करंदीकर हाँस्पिटलमध्ये पुन्हा रुजू झाले.त्यावेळी त्यांना जोशीबाई भेटल्या . जोशीबाई डाँ.करंदीकरांकडे पाठ्दुखीवर गेले अनेक वर्षे उपचार घेत आहेत.
डाँ.करंदीकरांनी जोशीबाईंना विचारले.‘मी नसतांना हाँस्पिटल ठीक चालले होते ना ? आमच्या नवीन मुलाला जमले ना सर्व ?.
जोशीबाई म्हणाल्या तुमचा मुलगा तुमच्यापेक्षा हुशार आहे.हातगुण पण आहे.अहो माझी पाठ्दुखी १५ दिवसात बरी केली त्यांने.
रात्री डाँ.करंदीकर आपल्या मुलाला म्हणाले चांगला दवाखाना चालवशील अरे त्या जोशीबाई इतके
वर्षे उपचार घेत होत्या म्हणून तू एम.बी.बी.एस झालास आता एम.डी कसा होणार ?

ती एक वस्तू

ती एक वस्तू
असं म्हणतात पहिलं प्रेम , पहिली खरेदी ,शाळेचा पहिला दिवस ,पहिल्या पगारातून आणलेली वस्तु काहिही विसरता येत नाही.आमच्याकडे तांब्यापितळ्याच्या खूप वस्तू होत्या. मी माझ्या वडिलांना अनेक वेळा म्हटलं आपण त्या वस्तू मोडीत देऊ .तांब्याचे पिंप देऊन स्टीलचे पिंप घेऊ पण वडील याला तयार होत नव्हते.ते म्हणाले आपल्याकडे काही नसतांना मी या वस्तू घेतल्यात .माझ्या पगारातून थोडे थोडे पैसे बाजूला काढून वस्तू जमवल्यात.वडिलांचे बोलणे मनावर फारसं न घेता मी एक दिवस सर्व जुन्या वस्तू बाहेर काढल्या.त्यामध्ये मला माझ्या लहानपणीचा छोटा तांब्या सापडला.मी या तांब्याशिवाय कधी पाणी प्यायलो नाही .माझा तांब्या कुणी घेतलेला मला आवडायचे नाही.हा तांब्या नसेल तर मी जेवत नसे.माझ्या लहानपणीच्या आठवणी त्या तांब्याने जाग्या केल्या.तो तांब्या मला खूप प्रिय होता वडीलांच मन मला त्या घटनेनंतर कळल होतं.माझ्याकडे मी घेतलेली पहीली बाईक जपून ठेवलेली आहे.आपल्याही असतील अश्या काही आठवणी.एखादी गाडी ,आवडती पँन्ट,चादर ,शाल चला शेअर करु या !
प्रगतीच्या वाटेवर जात असतांना मागे वळून पाहिल्यावर या आठवणी किती-किती गोड वाटतात ना !