बुधवार, १० फेब्रुवारी, २०१०

भ्रष्टाचाराची पाळेमूळे

भ्रष्टाचाराची पाळेमूळे
भ्रष्टाचाराची पाळेमूळे आपल्या देशात आपल्या संस्कृती इतकी खोल रुजली गेली आहेत असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे.गल्ली पासून दिल्ली पर्यंत पसरलेल्या या समाजव्यवस्थेतील किडीला ‘ चलता है ’ म्हणत आपण अधिकच खतपाणी घालतो.भ्रष्टाचार करणार्‍यांची ही अफाट बुध्दिमत्ता त्यांनी योग्य कामी वापरली तर भारत महासत्ताक होण्यास फार वेळ लागणार नाही. काही भ्रष्टाचाराचे किस्से मला दिसलेले आपणा समोर ठेवतोय .....कृपया हे वाचून ‘ चलता है ’ म्हणू नका.
भारत निर्माण
भारत सरकारची एक अभिनव योजना आहे भारत निर्माण .! टि.व्हि वर वृत्तपत्रात या योजनेच्या अनेक जाहीराती झळकतात.पाणीपुरवठा हा यातील एक मुख्य भाग. ज्या गावांना कमी पाणीपुरवठा होतो. टंचाईमुळे टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो, प्रदुषणामुळे पाणीपुरवठा खराब झालेली गावे अशा गावांना मुबलक पाणी मिळावे यासाठी आखलेली ही योजना. केन्द्र सरकारचा भरपूर पैसा असल्याने तो संपवण्याकडे राज्याचा कल असतो त्यामुळे नियमात नसलेल्या गावांचाही या योजनेत समावेश केला जातो. पुरेसे पाणी व अगोदरच एक पाणीपुरवठा योजना असतांनाही गावांसाठी दुसरी योजना ही घेतली जाते. योजनेसाठी अगाऊ निधी ग्रामपंचायत अथवा पाणीपुरवठा समीतीकडे जातो.हा पैसा खात्यातून काढला जातो, स्वत:साठी वापरला जातो आणि योजना अपूर्ण रहाते.या योजनेसाठी लोकसंख्या मुख्य अट आहे .गावाची सध्याची लोकसंख्या यात पुढील ३० वर्षाची लोकसंख्या गृहीत धरली जाते. माणशी २३६०/- रुपये या प्रमाणे योजनेचे अंदाजपत्रक तयार होते. एखाद्या गावाची लोकसंख्या १०० असल्यास १०० x २३६० =२३६०००/- रुपये एवढी योजनेची किंमत होते.
भ्रष्टाचाराचा किस्सा --
ही योजना राबविणार्‍या एका गावाची लोकसंख्या ३०० आहे. परंतु गावातील पुढारी ,ठेकेदार .सरकारी अधिकारी हुशार ! त्यांनी लोकसंख्या वाढविली शिवाय गावात पहाण्यासाठी दगडगोटे या शिवाय काहिही नसतांना गावात हजारो पर्यटक येतात असे दाखवून लोकसंख्या अजून वाढविली आणि योजनेची किंमत १ कोटी १२ लाख रुपये इतकी केली.जी योजना २०-२५ लाखात झाली असती तिला तब्बल १ कोटी १२ लाख रुपये खर्च दाखवला.सरकारी अधिकारी व नेते यांच्या संगनमताने योजनेला मंजूरी मिळाली.पण हे गौडबंगाल काही जागरूक नागरीक ,प्रसारमाध्यम यांच्या मुळे उजेडात आले .मित्रानो अशा अनेक प्रकारामूळे ही योजना बारगळत चाललेली आहे.केन्द्राचा पैसा वाया जात आहे .योजनेचे पैसे खात्यातून काढून संपले पण योजना पूर्ण नाही अशी अनेक प्रकरणे पोलिस ठाण्यात दाखल आहेत.या योजनेतून कोट्यावधी रुपये पाणीपुरवठ्यासाठी खर्च झाले पण आजही अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो .
भ्रष्टाचाराचे अजूनही काही किस्से गुलदस्त्यात......