क - कथेतला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
क - कथेतला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ५ ऑगस्ट, २०१०

परदु:ख शीतल

उत्तमकथा मासिकातर्फे दरवर्षी कथा स्पर्धा आयोजित केल्या जातात. उत्तमकथा मासिकाच्या या कथा स्पर्धेत माझ्या परदु:ख शीतल या कथेला प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळाले .ही कथा ९ जून २००७ च्या उत्तमकथा मासिकात प्रसिद्ध झाली.
...........................................................................................................................



लांबलचक ढेकर देत राजाभाऊ अंगणात आला.हातात पानाची चंची अडकवलेली आणि अडकित्त्याने सुपारी कातरत राजाभाऊची नजर आजूबाजूला भिरभिरू लागली. कातरलेली सुपारी तोंडात टाकत त्यांने अडकित्ता चंचीत टाकला आनि पोटावरून हात फिरवत त्याने शतपावलीला सुरूवात केली.
नेसलेल्या लुंगीच्या वरुन डोकावणारं त्याचं भलमोठं पोट दिवसेंदिवस अधिकच वाढत होते.पोटाचा नगारा ,तब्बेतीने स्थूल आणि दिसायला घारागोरा...असा हा राजाभाऊ टिपिकल कोकणस्थ !.
शतपावलीला घालतानाच राजाभाऊ मध्येच खांद्यावर टाकलेली बनियन हाताने गरागरा फिरवून स्वत:ला वारा देत होता.राजाभाऊच्या या सवयी शेजा‌र्‍यांना तशा अगदी तोंडपाठ झालेल्या आणि त्याही पेक्षा अधिक, शेजा‌र्‍यांच्या घरी काय चाललंय हे राजाभाऊला चांगलंच ठाऊक असायचे.राजाभाऊचे गिम्हवण्याचं घरही अगदी मोक्यावर.....घराच्या अंगणात उभं राहिलं की कोणाकडे कोण जातयं..हे सारे कळायचं.घरासमोर भाजी नेणा‍र्‍या बायका घरी कोणती भाजी नेतात हे देखिल त्याला माहित असायचं आणि त्या जोरावर तो जावडेकरांना रस्त्यात थांबवायचा "काय जावडेकर , आज तोंडल्याची भाजी ?"राजाभाऊच्या या प्रश्नावर जावडेकरही अवाक व्हायचे.घराच्या आवारातून जावडेकरांच्या घरी काय चाललंय हे राजभाऊला कळायचं
गवाणकरांची सून रागाने तरातरा कुठे गेली?. जी.के.चा मुलगा आज इंटरव्हूला कुठे गेला होता ?.इथ पासून रानडेच्या मुलीला कुठले स्थळ आलयं याची इत्यंभूत माहिती राजाभाऊला असायची...आणि ती का नसावी ?.कारण दिवसभर जेवणे ,खाणे,गप्पा आणि आराम याशिवाय त्याच्या आयुष्यात विशेष काहिच नव्ह्ते.घरात म्हातारी आई अंथरुणाला खिळ्लेली असायची.तिच्या सेवेला एक मोलकरीण असे.तिचं नि राजाभाऊचं काहीतरी चक्कर असावं अशी चर्चा गावात असायची.परंतु हा भाग दुय्यम !.
सकाळी उठलं कि साफसफाई करायची, देवपूजा आणि त्यानंतर अंगणातील आरामखुर्चीत मनसोक्त अंग झोकून द्यायचं.पेपर वाचायचे .आरामखुर्ची समोर पाच सहा खुर्च्या मांडून ठेवायच्या. कमरेला लुंगी , अडकित्ता सुपारी जोडीला. सारी तयारी झाली की मग राजाभाऊची नजर शोधू लागायची गप्पा मारण्यासाठी एखाद्या जोडीदाराला.गप्पा मारण्यासाठी राजाभाऊला कोणत्याही वयोगटा्तील व्यक्ती चाले.अट एकच गप्पा रंगल्या पाहिजेत !
मुंबईत मोटारी बनवणार्‍या एका कंपनीत राजाभाऊ चांगल्या पगारावर नोकरीला होता.कंपनीने जेव्हा स्वेच्छानिवॄत्ती जाहिर केली त्यावेळी पहिली उडी मारणारा माणूस होता राजाभाऊ सोमण ! राजाभाऊने स्वेच्छानिवॄत्ती घेतली. त्यातून मिळालेले पैसे गुंतवून राजाभाऊ स्थायिक झाला तो आपल्या दापोली जवळच्या गिम्हवणे गावी ! राजाभाऊ घरही अगदी हर्णे- मुरुड रस्त्यावर.त्यामुळे घराच्या काही खोल्या पर्यटकांना भाड्यांने देऊन त्यातून बर्‍यार्पैकी उत्पन्न मिळवत असे.लग्न झाल्यानंतर काही महिन्यातच राजाभाऊची बायको त्याला सोडून गेली.स्वच्छंदी जीवन जगणार्‍या राजाभाऊला कदाचित हा पाशही नकोसा झाला असावा ! कोणतीही काळजी नाही. कशाचीही फिकीर नाही असं बिनधास्त आयुष्य राजाभाऊच्या वाट्याला आले होते समर्थाना राजाभाऊ जर भेटला असता तर त्यांनी जगी सर्व सुखी कोण आहे ? असे विचारण्याचे धाडसच केलं नसतं
दुपारी आणि सायंकाळी अंगणात भरपूर गप्पा रंगायच्या..मनसोक्त किस्से सांगितले जायचे.आणि त्या गप्पांना हळूहळू झालर चढायची ती दु:खांची!..राजकारण ,भारनियमन,क्रिकेट पासून सुरू होणार्‍या गप्पा जेव्हा कौटुंबिक पातळीवर यायच्या तेव्हा मात्र अंगणही भारावून जायचं. राजाभाऊला नेमकं हेच हवं असायचं.जो पर्यंत गवाणकरांना सून आता कशी वागते ? हा प्रश्न विचारला जात नसे तोपर्यंत गवाणकर सूने विषयी भडाभडा बोलत नसत.मुलीचे कुठे जमतंय का ? असं विचारल्या शिवाय रानड्यांची कहाणी सुरू होत नसे.जावडेकरांची पेन्शन ,जी.के.च्या मुलाची नोकरी .याविषयांवर मग जो-तो भडाभडा बोलायचा आणि आपले मन हलके करायचा. याचा परिणाम राजाभाऊवर होत नसे.तो मात्र निर्विकारपणे आपल्या घड्याळाकडे पाही.‘चला चांगला टाईमपास झाला‘असं बोलुउन तो दुसर्या दिवशीचा विचार करत असे .दररोज घराच्या अंगणात दु:खाच्या,तक्रारीच्या कहाण्या सांगितल्या जायच्या आणि राजाभाऊ त्या ऐकून समाधानी होत असे.वेळ जात नसला कि तो एखाद्या शेजार्‍याला बोलावून घीए व त्याच्यापुढे त्याच्या वर्मी लागणारा विषय काढत असे की ज्यामुळे हा शेजारी आपल्या मनातलं सारं काही बोलून टाकायचा. शेजार्‍याचे मन हलके व्हायचं आणि .राजाभाऊचाही वेळ जायचा.वेळ घालवण्याचे एक हुकमी अस्त्र राजाभाऊकडे होते.
राजाभाऊने घड्याळात पाहिले दुपारचा एक वाजला होता.त्याने खिडकीतून आत डोकावले म्हातारी आई झोपलेली होती.दुपारी जरी ऊन असलं तरी घराजवळच्या भल्या मोठ्या झाडांमुळे अंगणात गर्द सावली येत असे.या सावलीत आरामखुर्ची सरकवत त्यावर राजाभाऊ रेलला.डोळ्यावर चष्मा लावत तो पेपर वाचू लागला.पेपर वचतानाही त्याची नजर मध्येच बाहेर भिरभिरत होती तेवढ्यात त्याला बाबुराव सावंत येताना दिसले..राजाभाऊने अंगणातून बसल्या जागेवरून हाक मारली " सावंत तात्या..... "
राजाभाऊच्या दणदणीत आवाजाने सावंत जागीच थांबले.हातातला पेपर बाजूला ठेवत राजाभाऊ फाटका पर्यंत गेला.
" कुठे गेला होतात ?" फाटक उघडत राजाभाऊनी विचारले.
" जरा भाच्याकडे गेलो होतो " सावंत रस्त्यावरूनच बोलले.
" अहो, या जरा बसा ."
" नको राजाभाऊ.अहो, घरी जायला उशीर होईल."
"अहो, या जरा .कधीमधी भेटणारी माणसं तुम्ही या ." राजाभाऊनं सावंताना गळ घातली.गोड्गोड बोलत राजाभाऊनी अखेर सावंताना अंगणात आणलचं.
" भाच्याकडे काय विशेष ?" खुर्चीत रेलत राजाभाऊनं विचारलं.
"विशेष काही नाही.अँग्रिकल्चर काँलेजला आहे.इथे हाँस्टेलला रहातो.बहिण म्हाणाली जरा लक्ष ठेवत जा."
"लक्ष ठेवायलाच पाहिजे ,त्यात तुम्ही मोठे ." सावंतांच्या वाक्यावर राजाभाऊ उत्तरला..’तुमचा मुलगा पण अँग्रिकल्चरला होता ना ?’ राजाभाऊनी खडा टाकलाच.
"तो एम.एस.सी झालाय. पुण्याला असतो.".
" मध्ये त्याला पाहिला होता ,सोबत बायको होती काय ?" राजाभाऊ हळूहळू सावंतांच्या वर्मावर घाव घालू लागला.सावंत थोडा वेळ स्तब्ध राहिले.
" लग्न कुठे पुण्याला केलं काय ? बोलवलं नाही आम्हाला ? " राजाभाऊच्या प्रश्नावर सावंतांची नजर झुकली.
" नाही,म्हणजे त्यानीच जमवलं." सावंत शांतपणे म्हणाले.
" जाऊ दे, अहो, त्यात काही विशेष नाही .हल्ली भरपूर लग्न अशीच होतात." राजाभाऊनं दिलासा दिला.
"चालायचं म्हटल की सगळं चालतं.आईवडिलांनी मुलांकडून जास्त आशा बाळगायच्या नाहीत हेच खरे" .सावंत गंभीर झाले होते.
"जातीतली आहे ना ? तुम्ही ९६ कुळी ना ?"
"जातीतली असती तर कशाला ? " सावंत तिरस्काराने म्हणाले.
"रीतभात तरी आहे का ?" राजाभाऊनं भारीला एक प्रश्न विचारलाच.
"कोण बघतंय ?.लग्न झाल्यावर सोपस्कार म्हणून गेलो होतो आम्ही .तुम्ही करा राजाराणीचा संसार ". सावंत नैराशाने म्हणाले.
"तुम्हाला सांगितलं होतं का त्याने ?"
"तो हरामखोर हो,पळून गेला आणि लग्न करून आला.आता हा शिकला सवरलेला ,२५ हजार पगार घेणारा मुलगा,त्याला आपण काय बोलणार ?" सावंत रागाने बोलले आणि राजाभाऊ त्यांच्याकडे पहात बसला.
सावंत सारं काही भरभरून बोलले.मुलाने परस्पर लग्न केल्याचे त्यांच्या जिव्हारी लागलं होतं
" खरं सांगू राजाभाऊ म्हणून आम्ही दोघं कुठे बाहेर पडत नाही."
सावंतांच्या या वाक्यावर .राजाभाऊनं त्याना धीर दिला."तसं काही मानू नका सावंत ,अहो हल्ली चलतं सगळं".
"तुम्हाला नाही कळायचं राजाभाऊ परदु:ख शीतल असतं राजाभाऊ"
सावंतांच्या बोलण्यात अखेर ‘परदु:ख ’ हा शब्द आलाच.
‘परदु:ख शीतल असत ‘ हा शब्द या अंगणात राजाभाऊने हजारवेळा ऐकला होता.
"हे बघा तात्या, तुम्हाला काही वाईट वाटायला नको. कुठे नाही गेलात तरी माझ्याकडे या आणि तो तुमचा मुलगा आला तर त्यालाही माझ्याकडे पाठवा." राजाभाऊनं सावंताना दिलासा दिला.
राजाभाऊच्या अंगणातून सावंत हळुवार पावलं टाकत बाहेर पडले.थोडावेळही बसण्यास तयार नसलेल्या सावंतांच्या भावनेचा बांध असा काही फुटला कि तब्बल दोन तास सावंत आपल्या व्यथा राजाभाऊला सांगत होते.सावंत गेल्यावर राजाभाऊने हातपाय लांब केले.एका बाजूला शिकला सवरलेला सावंतांचा मुलगा परस्पर लग्न करून आला.तर दुसरीकडे रानड्यांची मुलगी पंधरा ठिकाणी दाखवूनही कोणाच्या पसंतीला येत नव्हती.मुलीच्या या चिंतेने रानडे हैराण झालेले असायचे.रानडे मुलगी दाखवून आले की ही बातमी राजाभाऊला कळायची आणि संध्याकाळी "मग ठरलं का मुलीच लग्न ?" असा खोचक प्रश्न राजाभाऊ रानड्यांना विचारायचा . रानडेही मन मोकळं करायचे आणि राजाभाऊचाही वेळ जायचा.
"ठरेल हो धीर धरा" असा वर दिलासा राजाभाऊ त्यांना द्यायचा." परदु:ख शीतल असतं राजाभाऊ तुम्हाला मुलगी नाही म्हणून हे दु:ख तुम्हाला कळणार नाही ." रानडे असं म्हणून गप्प व्हायचे.
घराच्या या अंगणात गप्पांतून अनेक दु:ख समोर आली. याच अंगणात ‘परदु:ख शीतल असतं ‘ हा शब्द प्रतिध्वनी सारखा उमटत असे.
राजाभाऊ मात्र निर्विकार असे .कसली दु:ख नि काय ! आपल्या सारखं आयुष्य पाहिजे.लोक काय म्हणून दु:खाच एवढ भांडवल करतात राजाभाऊच्या मनात हा विचार नेहमी येई. मुंबईतील आपली नोकरी किती चांगली होती . स्वेच्छानिवॄत्तीच्या कल्पनेने अनेक जण गळफटले.आता कसं होणार ही चिंता अनेकांना लागली होती पण आपण बिनधास्त स्वेच्छानिवॄत्ती घेतली .मुलीचं लग्न ठरत नाही म्हणून रानडे रडतात.पुन्हा पुन्हा त्याच विषयावर दु:खी कष्टी होतात.छॆ:! च्यायला ! माझी बायको सोडून गेली तेव्हा आपल्याला काही वाटलं नाही .सुरवतीला सगळे विचारायचे "राजाभाऊ वहिनी कुठे आहेत ? माहेरी गेल्या वाटतं ?" .त्यावेळी सगळ्यांना एकदाच सांगून टाकलं बायको मला सोडून गेली आहे.ती पुन्हा येणार नाही....एकदाच विषय फिनिश ! आरामखुर्चीत बसल्या बसल्या राजाभाऊच्या मनात विचार येत होते.
आपल्या अंगणात हजारो तक्रारी ,गार्‍हाणी ऐकून राजाभाऊ चक्रावून जायचा.जी.के म्हणायचे "राजाभाऊ दु:ख कुणाशी तरी उघडं केलं की मन हलकं होतं.एकवेळ माणूस सुख स्वार्थाने एकटा उपभोगेल पण दु:खासाठी त्याला सोबत असावी असं वाटत रहातं" .
"खरच असं वाटत असेल , दु:ख बोलून हलकं होत असेलं ?" राजाभाऊ या सार्‍या गोष्टीवर काहीकाळ विचार करत असे.
"जाऊ दे "असं म्हणून विषयही सहज सोडून देत असे. राजाभाऊकडे तसं बोलायला फारसं काही नव्हतं.माडाला नारळ किती आले आमसुलं किती विकली ....नाहीतर मुंबईतील गप्पा असे जुजबी विषय तो इतरांशी बोलायचा.पण इतरांच्या पोटात शिरून मात्र तो सारे बाहेर काढत असे.आणि नेमक्या याच गोष्टी त्याला विरंगुळा द्यायच्या.
पेपर वाचणं हा राजाभाऊचा आणखी एक छंद ! पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत ,मोठ्या बातम्यांपासून अगदी छोट्या जाहिरातींपर्यंत सारा पेपर राजाभाऊ वाचून काढत असे .पेपर वाचतावाचता आजूबाजूला नजर भिरभिरत असायची.पण आज काहितरी वेगळं घडलं होतं.पेपर वाचता वाचता राजाभाऊ गंभीर झाला.एरव्ही पेपर वाचताना आजूबाजूला पाहणार्‍या राजाभाऊची नजर आज पेपरवर खिळली होती.
‘शारदा सहकारी बँन्केत आर्थिक घोटाळा बँन्क दिवाळखोरीत जाण्याची शक्यता ‘
या बातमीच्या मथळ्यावर राजाभाऊची नजर स्थिर झाली.त्याने पेपरातील संपूर्ण बातमी वाचून काढली.डोळ्यावरचा चष्मा काढला आणि गंभीर चेहर्‍याने तो खुर्चीत विचार करत बसला.बातमीतल्या ओळी तशानतशा पुन्हा त्याच्या डोळ्यापुढे येऊ लागल्या .
"आत्ताच्या आत्ता दापोलीली निघायला हवं". राजाभाऊ स्वत:शी पुटपुटला .खुचीतून उठत कपडे बदलण्यासठी तो मधल्या खोलीत आला.आई शांतपणे झोपली होती,कपाटाचा आवाज न करता अलगद त्याने पासबुक आणि डिपाँझिट्च्या पावत्या काढल्या.आईला झोपेतून न उठवताच शेजार्‍याला कल्पना देऊन तो घराबाहेर पडला.
शारदा सहकारी बँन्क पेपरातील बातमी राजाभाऊच्या डोळ्यासमोर येत होती.रिक्षा करून तो बँन्केत पोहचला.बँन्केसमोर खातेदारांची भलीमोठी रांग लागली होती.ते दॄश्य पाहून राजाभाऊ अवाक झाला." पैसे बुडाले बहुतेक.... झक मारली आणि इथे पैसे ठेवले"...".चेअरमनला बोलवा आणि आमचे पैसे परत करा.".अशा एकावर एक कानावर पडणार्‍या वाक्यानी त्याचे डोके चक्रावून गेलेतो शांतपणे शेजारच्या कठड्यावर बसला.स्वेच्छानिवॄत्ती घेतल्यानंतर राजाभाऊने बहुतेक पैसे याच बँन्केत गुंतविले होते.आणि त्या व्याजावर तो आपला प्रपंच चालवत असे.गेले तीन महिने पर्यटकांच्या गर्दीमुळे खोल्या बुक झाल्याने तो बँन्केत पैसे काढण्यासाठी आला नव्हता.
"तुमचे किती पैसे आहेत ?" शेजारच्या व्यक्तिच्या आवाजाने राजाभाऊ विचारातून जागा झाला.
"तीन लाख" राजाभाऊ शांतपणे म्हणाला.
"आमचे कमी आहेत ,सत्तर हजार.पैसे मिळतील का हो ? घर बांधयला काढलयं".
राजाभाऊ शेजारच्या माणसाकडे पहात बसला .ज्या प्रश्नाचं उत्तर राजाभाऊलाही हवं होतं तोच प्रश्न ती व्यक्ति विचारत होती.बँन्केने खातेदारांनी संयम पाळावा अशी बाहेर नोटीस लावली होती.बँन्केच्या बाहेर राजाभाऊ दोन तास ताटकळत होता.परंतु कोणताही तोडगा न निघाल्याने तो घरी परत आला.
घरची परिस्थिती गरीबीची असताना मुंबईचा रस्ता धरलेल्या राजाभाऊनं अहोरात्र मेहनत करून पैसे जमविले.हे पैसे बुडणार तर नाहीत ? या विचाराने तो कासाविस झाला.काडीकाडी जमवून साठवलेला पैसा....आपला पैसा काय हारामाचा पैसा आहे! कधी मिळतील पैसे, तो पर्यंत करायचे काय ?असे अनेक प्रश्न राजाभाऊ समोर आ वासून उभे होते.
घराकडे परततांना त्याची पावली थकली होती. डोळ्यातून फक्त अश्रू येणं बाकी होतं घरात न जाता तो अंगणातील खुर्चीत धपकन बसला.कपाळावर आलेला घाम त्याने रुमालाले पुसला.बँन्केच्या पासबुकावरून तो सारखासारखा हात फिरवत राहिला.बँन्केतील पैशाचा विमा असेल तर पैसे परत मिळतील.नाहीतर ,आयुष्याची सारी कमाई वाया जाणार या विचाराने तो चलबिचल झाला.
बँन्केतून परतल्यावर दोन दिवस झाले तरी राजाभाऊ कुणाशी काही बोलला नाही. दोन दिवसात कुणीही शेजारी फिरकलाही नाही.त्यामुळे राजाभाऊ अधिकच बेचैन झाला होता.ह्र्दयात दु:ख अगदी गच्च भरलं होतं.त्याला वाट करून दिली नाही तर त्याचा स्फोट होणार होता. दोन दिवसानंतर तो घराबाहेर पडला.घराच्या आवारात येरझार्‍या घालू लागला.रानडे ,सावंत,जावडेकर,वागळे ,गवाणकर कुणीतरी भेटतंय का? याची राजाभाऊ आतुरतेने वाट पहात होता.खूप खूप वाटू लागलं कुणाला तरी सांगावं ‘शारदा बँन्क बुडतेय.माझे पैसे बुडणार.‘. येरझारा घालताना राजाभाऊ स्वत:शीच बोलत होता.एवढ्यात त्याला गवाणकर येताना दिसले आणि त्याचा जीव भांड्यात पडला.गवाणकरांना तरी सारं सांगता येईल या विचाराने तो पुढे आला.
"गवाणकर.." या आपल्या नेहमीच्या आवाजाने राजाभाऊने हाक मारली.
" राजाभाऊ,आता फार घाईत आहे .उद्या येतो ".गवाणकर तसेच बाहेरून निघाले.
"अहो ,गवाणकर,पाच मिनीटे तरी या "
"नको राजाभाऊ प्लीज ."राजाभाऊच्या विनंतीला मान न देताच गवाणकर सटकले.
वागळेही तसेच न थांबता निघून गेले.
रानड्यांना येताना पाहून राजाभाऊला धीर आला.रानड्यांसमोर मन मोकळं करता येईल हा विचार त्याच्या मनात येत असतांनाच नातवाला शाळेतून आणण्याची सबब पुढे करुन रानडेही निघून गेले.सावंताना भाजी आणण्याची घाई होती.त्यामुळे रात्री जेवून बसू असे आश्वासन देऊन सावंतही निघून गेले होते.
खूप वाट पाहूनही राजाभाऊला कुणीही भेटले नाही.एरव्ही तासनतास गप्पा मारून आपलं दु:ख हलकं करणारे सारे आज मात्र राजाभाऊचं एकण्याला हजर नव्हते .राजाभाऊ अक्षरश: रडकुंडीला आला. आपलं मन मोकळं करावं , आपलं दु:ख कुणा पुढेतरी हलकं करावं , आपल्याही दु:खात कुणीतरी वाटेकरी असावं असं राजाभाऊला खूप खूप वाटू लागलं .पण कुणीही त्याला भेटू शकले नाही.दु:खी मनाने तो माजघरात आला.आजारी आई काँट्वर झोपलेली होती.तिच्या पायाजवळ तो बसला.
‘आई ,मुंबईतून आणलेले पैसे ज्या बँन्केत ठेवले होते ती बँन्क.. ’...आणि त्याच्या अश्रूंचा बांध फुटला. एवढे दिवस दाबून ठेवलेले अश्रू डोळ्यातून भळाभळा बाहेर पडले.बिनधास्त ,स्वच्छंदी ,उद्याची तिळमात्र तमा न बाळगणारा राजाभाऊ, आईच्या पायाजवळ बसून मनसोक्त रडला.
घरा बाहेर आला तेव्हा राजाभाऊला खूप हलकं हलकं वाटलं.अंगणात ठेवल्या आरामखुर्चीत तो रेलला.त्याला खूप काही बोलयचं होतं..आभाळाकडे नजर टाकत, डोक्यावर हात ठेवून आभाळाकडे तो शांतपणे पहात होता.समोरच्या खुर्च्या रिकम्या होत्या.अंगण अगदी सामसूम होतं. परदु:ख शीतल असतं हे वेगळं सांगण्याची आता गरजच उरली नव्हती.

लेखक -सुनिल पाटकर
.........................................................समाप्त.......................

शनिवार, २४ जुलै, २०१०

नयना

एक लाखाच्या त्या छोट्याशा गाडीने टि।व्ही.चा छोटा पडदा अगदी दिवसभर व्यापून टाकला होता.ती कशी असेल ? कशी दिसेल ? तिचा रंग काय असेल ? अशा अनेक प्रश्नांचा भडिमार आणि त्यांची उत्तरे यांनी हा छोटा पडदा व्यापून गेला होता.आणि त्याही पेक्षा, कित्येक पटीने आँफिसमधल्या माझ्या सारख्या अनेकांच्या मनाचे पडदे तिने काबीज केले होते.दिवसभर लोकल मध्ये लोंबकळणारे,बसच्या रांगेत तासनतास उभे राहून प्रवास करणारे , गळ्याला टिफिन अडकवून आँफिसला पळणारे माझ्यासारखे अनेकजण ,त्यांची अनेक वर्षे उराशी असणारी स्वप्नं या गाडीने पुन्हा जिवंत केली होती.बाकी आम्ही मध्यमवर्गीय... ! स्वप्नांवर जगणारे ,स्वप्नातच रममाण होणारे !स्वप्नात आम्ही कधी तेंडूलकर होतो आणि सामना जिंकून देतो. कधी आम्ही अमिताभ होतो आणि ‘आज भी मै फेके हुए पैसे नही उठाता ’असे म्हणत स्वाभिमानी होतो.एखादी सुंदर तरूणी आमच्या प्रेमात पडते तिला आम्ही ताज मध्ये जेवायला.स्वप्नात !.नाहीतर माँरिशीसच्या एका रमणीय बेटावर निवांत झोपून ज्यूस पितो हे देखिल स्वप्नातच ! पण आम्हा मध्यमवर्गीयांना स्वप्नपूर्तीचा आनंद मिळवून देणाचं काम केलं ते नितीन छ्ड्डाने ! छोट्या का होईना पण,स्वत:च्या कारमध्ये आपल्या पत्नीमुलांसह बसण्याचं भाग्य मिळणार होतं.खरंतर ही कल्पनाही पुढील काही दिवस सुखात जगण्यासाठी आम्हाला पुरेशी होती.तसा माझा संबंध लहानपणीच काय तो गाड्यांशी आला होता.काका मामांनी आणून दिलेल्या जत्रेतील त्या छोट्या गाड्या फिरवता-फिरवता मी लहानाचा मोठा झालो.अगदी माझ्यासारख्या इतर मध्यमवर्गीयांसारखा !.पण ,टि.व्ही वर अनेक दिवस दिसणार्‍या त्या छोट्याशा गाडीने लहानपणीची आवड पुन्हा मनात निर्माण केली होती.तिच नावही अगदी सुंदर होतं ‘ नयना ’खरंच !नितीन छ्ड्डाने आम्हा मध्यमवर्गीयांना गाडीत बसविण्याचा विचार जर केला नसता तर आँफिस बाहेर उभ्या असलेल्या रंगीबेरंगी गाड्या पाहण्यात आमचं उभं आयुष्य गेलं असतं.!गेले दोन दिवस टि.व्ही वरच्या त्या बातम्या मीही पहात होतो.एकदाची पिवळ्या रंगाची नयना मला दिसली.पहिल्या नजरेतच मी तिच्या प्रेमात पडलो आणि मनाशी पक्का निश्चय झाला , नयनाला घरी आणायची .गाडी अगदी रोडवर येईपर्यंत दिडलाख गेले तरी चालतील पण, नयना दारात उभी राहिलीच पाहीजे ! गाडीत बसण्याचं आपलं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे !तसं लहाणपणापासूनच मला गाड्यांचं खूप आकर्षण. माझ्या एका मित्राच्या वडिलांची त्या काळी गाडी होती.त्या गाडीतून मित्राबरोबर शाळेत जाण्याचा योग कधी - कधी यायचा.सुट्टीत त्याच्या घरासमोर उभ्या असलेल्या बंद गाडीत आम्ही खेळतही असू.माझ्या वह्यांमध्येही गाड्यांचे फोटो असायचेत्या वेळी गाड्या कमी होत्या. पण काँलेजला गेल्यावर ही आवड वाढली.मी चारचाकी चालवायला शिकलो.आयुष्यात एकदा तरी गाडी घ्यायची,त्यातून मनसोक्त फिरायचं आणि वाटलं तर नंतर विकून टाकायची.पण,गाडी घ्यायचीच ! गाडी घेण्याची इच्छा अजूनही कायम होती.परिस्थिमुळे शिक्षण अर्धवट राहिले.सुदैवाने मुंबईत चांगली नोकरी मिळाली.माझ्या कार्यालयात माझ्या सारखे अनेक जण होते नी ते सुद्धा ही लाखाची गाडी घेण्यासाठी उत्सुक होते.आमच्या कार्यालयात ही नयना एक चर्चेचा विषय झाली होती.देसाई म्हणाला "बापट,बायकोला कालच बजावलय आपल्याला कुठलंही व्यसन नाही,आता तु विघ्न आणू नकोस ,मी गाडी घेणार आहे."तर सुर्वे कार्यालयामध्ये पहिली गाडी आपली असणार हा निश्चयच करून आला होता."पण,त्याने प्रदुषण हूणार आहे .पार्किंगची समस्या निर्माण होणार आहे " गोडबोले मँडम फाईलमध्ये डोकावत म्हणाल्या.त्यांच्या या वाक्यावर माझा पारा चढला." कसलं आलयं प्रदुषण ? बाकीच्या गाड्यांनी काय प्रदुषण होत नाही.गरीबांची गाडी आली ना, मग पार्किंग काय , प्रदुषण काय ? सारं काही दिसेल .हे श्रीमंतांचे शोध , त्यांनीच फक्त गाड्या चालवायच्या काय ?"माझा राग पाहून सारे थोडावेळ गप्प राहिले." हे अगदी बरोबर बोललात आण्णा " शिंदे शिपाई ओरडला.आँफिस,ट्रेन, बस, सोसायटीमध्ये या एक लाखाच्या गाडीची चर्चा रंगत होती.घरीही माझ्या डोक्यातून हा विषय जाईना."हे बघ काय लिहिलयं पेपरात,म्हणे या गाडीचा आवाज मोठा आहे" एवढ्या मोठ्या पेपरात माझं लक्ष त्याच बातमीकडे गेलं."काय झालं मोठा आवाज असेल तर ? ट्रक ,डंपरच्या नसतो मोठा आवाज "माझ्या या बडबडीकडे बायको शांतपणे पहात होती.माझा त्रागा पाहून ती म्हणाली "तो गाडीचा विषय सोडून इतर विषयांवर बोलाल का तुम्ही.घर नाही ,आँफिस नाही बघावं तेव्हा गाडी गाडीन गाडी.थोडं मन शांत ठेवा ."बायकोचा आवाज ऐकून मी थोडा शांत बसलो .थोड्यावेळानं मी तिच्या जवळ बसलो." तुला काय वाटतं आपण नयना घ्यावी ?माझं लहानपणापासूनच स्वप्न होतं स्वत:च्या गाडीत बसायचं " माझा चेहरा पाहून बायको हसली."कैवल्य पण करत नव्हता कधी असा हट्ट.तसं तुम्ही इतके वर्षात स्वत:साठी काहीच केलं नाहीत. तुम्हाला आवडली आहे ना, घ्या गाडी. पण,पैशाचं काय?""आहेत पैसे. रिमाचं लग्न झालयं , ती जबाबदारी आता नाही ,ब्लाँकचे हप्ते संपलेत .रिमाच्या लग्नाला अपेक्षेपेक्षा कमी खर्च आला. मी पैसे काढून ठेवलेत बाजूला ,आपली ओढाताण होणार नाही."माझ्या बोलण्यावर ती सुखावली.माझ्या मनाची तळमळ तिला कळली होती." हे बघा, आता गाडी घ्यायची नक्की झालयं.यापुढे घरी ,बाहेर ,टि.व्ही वर गाडीचा विषय बंद.बुकिंग सुरू होईल तेव्हाच या विषयावर बोलायचं,समजलं ?"बायकोने हसतहसतच मला दम दिला.त्यानंतर गाडीचा विषय आमच्या घरी क्वचितच निघे.दरम्यान गाडीसाठी लागणारे दीड लाख रुपये मी वेगळे काढून ठेवले. माझी नोकरी ,त्यात ब्लाँकचा हप्ता मुलांची शिक्षण ,प्रपंचाच्या या रगाड्यात गाडी घेण्याचा विषय कधिच मागे पडला होता॥पण आता सारं स्थिरावलं होतं मुलगा इंजिनिअर झाल्यावर अंधेरीच्या एका कंपनीमध्ये नोकरीला लागला होता.भावाची मुले स्थिरावल्याने गावीही पैसे पाठविण्याची चिंता नव्हती.कैवल्य नोकरीला लागल्याने माझाही प्रापंचिक भार कमी झाला होता.त्याच्या इतर मित्रांप्रमाणे तोही अमेरिकेला जाण्याच्या मन:स्थितीत होता.आम्ही गावाहून तालुक्याला ,तालुक्याहून मुंबईत आलो.आताची पिढी मुंबईतून अमेरिकेला जाण्याआठी उत्सुक आहे.नेटवर बसून कैवल्यचे काहीनकाही सुरू असायचे.परदेशी नोकरीसाठी नेटवरून तो बायोडेटा पाठवित असे.त्यांने घरी न सांगताच पासपोर्टही काढला होता. पासपोर्ट आल्यानंतर आम्हाला कळलं आमचे चिरंजिव परदेश गमनाची तयारी करत आहेत ! एक दिवस आपला मुलगा सातासमुद्रा पलिकडे जाणार हे मी माझ्या मनाला समजावलं होतं.आँफिसमधील सहकारी म्हणायचेही "बापट ,रिटार्यमेंट्नंतर अमेरिकेत जाण्याचा योग आहे तुझ्या नशिबात." आणि माझी मान अभिमानाने उंचावायची.बरेच दिवस मागे पडलेला नयनाचा विषय पुन्हा अचनक चर्चेत आला तो नयना शोरुमला आल्याने ! ‘नयना शोरुमला दाखल ’ अशा बातम्या वृत्तपत्रात झळकल्या आणि गाड्यांची शोरुम गर्दी खेचू लागली.फक्त एक लाख लोकांनाच नयना मिळणार म्हणून माझ्या सारखे अनेक जण हिरमूसले.शेवटी इथेही नशिबाचा भाग होताच.बायकोला नेऊन नयना दाखविली.तिला गाडी आवडली.चांगला गुरुवार पाहून ३ हजार रुपये भरून नयना बुक केली.माझ्या आयुष्यातील तो एक आनंदाचा क्षण होता.पण त्या बरोबर एक काळजीही होती एक लाख लोकांत आपला नंबर लागेल ना ?.पण , बायकोने दिलासा दिला ".इतकी वर्षे गाडीच स्वप्न पाहताय, आपल्याला गाडी नक्की मिळेल."बुकिंगनंतर काही दिवस पिवळ्या रंगाची ती इवलिशी नयना मला डोळ्यासमोर सारखी दिसत असे.सहा महिन्यात नयना आपल्याला खरेदी करावी लागेल याचा अंदाज बांधून मी पैशाचे नियोजन केले होते .पावसाळ्यातील चार महिने बघताबघता निघून गेले आम्ही गाडी बुकिंग केल्याची बातमी सर्व नातेवाईकांत वार्‍यासारखी पसरली होती.अन एक दिवस कैवल्यने घरी बाँम्ब्च टाकला."पप्पा ,मला जाँब मिळतोय यु.एसला ,काय करू ?"त्याच्या या वाक्यावर मी आणि पत्नी त्याच्याकडे पहातच बसलो." सकाळी सकाळी गंमत करू नको कैवल्य" त्याच्या आईने त्याला सुनावलं."गंमत नाही करत मी खरंच मला जाँब मिळतोय ."त्याच्या वाक्याने आमचे चेहरे आनंदाने फुलले.या आनंदामागे थोडं दु:खही दाटलेले होते." काय करू काय विचारतोस ?जायचं .""पप्पा, जास्त नाही तीन-चार वर्षे तिकडे जाँब करून इकडे येईन." आमची मन:स्थिती कैवल्यला कळली असावी म्हणूनच तो असं बोलला. त्याच्या बोलण्यानं मला दिलासा मिळाला." काय जाँब आहे ?""पप्पा, उद्या इंटरव्ह्यू आहे फोर्टला,मोठी कंपनी आहे.त्यानंतर सर्व काही ठरेल."" बेस्ट लक ,तू जा.फक्त सर्व माहिती नीट घेऊन ठेव."" त्याची काळजी करू नका ,फक्त मम्मीला समजावा."" नक्की ,ते तू माझ्यावर सोड "मी आत्मविश्वासानं सांगितलं.कैवल्यला परदेशात नोकरी मिळणार या कल्पनेने माझी छाती अभिमानाने फुलून आली होती.त्याच्या आईला मात्र वाईट वाटलं होतं.आत्तापर्यंत शेजारीपाजारी आपला नातेवाईक अमेरिकेत असल्याच्या फुशारक्या मारायचे.आता मीही फुशारक्या मारायला तयार झालो होतो.कैवल्यचा इंटरव्ह्यू अतिशय सुंदर झाला.आणि आमच्या अपेक्षेप्रमाणे त्याला यु.एस.मध्ये जाँब निश्चित झाला.पगारही भलाभक्कम होता.इतर सोयी सवलतींची तर सरबत्ती होती.परंतु तरिही कैवल्य नाराज होता.मोठ्या उत्साहासाने इंटरव्ह्यूला गेलेल्या कैवल्यचा उत्साह मावळलेला दिसत होता.शेवटी न राहवून मी त्याला विचारलं." का रे नाराज तू ? एवढा चांगला जाँब आहे ना ?""पप्पा, जाँब चांगला आहे.तिकडे गेल्यावर पैसेही खूप मिळतील पण तिथे जाण्यासाठी कमीतकमी दोन लाख रूपयांची गरज आहे.आणि एवढे पैसे म्हणजे ?...."हताश झालेला कैवल्य पुढे काहीच बोलला नाही.शेवटी मी त्याची समजूत काढली."अरे, पैसे लागणारच ,पेरल्या शिवाय थोडंच उगवणार.आणि पैसे काय फुकट जाणार आहेत.हे बघ पैशांची तू काळजी करु नकोस.तयारीला लाग .""पण ,पप्पा...."" आता म्हटलं ना तयारीला लाग ." त्याच्या पाठीवर थोपटत मी म्हणालो. आणि कैवल्यचा चेहरा हास्याने उजळला.कैवल्य परदेशी जाणार म्हणून ही थोडी दु:खीच होती.परंतु मी तिला समजावलं. ‘ मुलाच्या भवितव्याच्या आड भावना आणू नकोस ’असं सांगितल्यावर ती थोडी सावरली होती.एक दिवस तिने मला अचानक विचारलं " पैशाचं काय करणार आहात तुम्ही ?"तिच्या वाक्यावर मी हसलो."हसून प्रश्न सुटत नाहीत." ती म्हणाली.’ अगं ,तू असं विचारतेस की सगळे पैसे संपले.""तसं नाही पण तयारी तर करायली हवी.""बँन्केत आहेत ,काही एफ़.डी.मोडायला लागतील.आज उद्या त्या मोडीन ." माझ्या वाक्यावर तिला थोडं बर वाटलं." आणि गाडीचं काय करणार ?समजा नंबर लागला तर ?"तिने माझ्या वर्मावरच बोट ठेवलं.जो विषय मी टाळतं होतो तो तिनं अचूक काढला."गाडीचं काय ?नंतर बघू.रिटायर्ड झाल्यावर घेऊ."" अहो, पण तुमचं स्वप्न ?"" मुलांच्या स्वप्नांपुढे आपली स्वप्ने काय महत्वाची ?तसं त्या गाडीचा विषयही मागे पडलाय.मी गाडीसाठी ठेवलेली दिड लाख काढतो.थोडी भर करू. कैवल्यला चांगली संधी आलेय.ती वाया जाता कामा नये."बायको माझ्याकडे बघतच बसली."बघतेस काय अशी, आपण मध्यमवर्गीय , आपल प्रपंच हेच आपलं सुख, मुलांच्या स्वप्नांपुढे माझी स्वप्ने महत्वाची असतील ,तर मी स्वार्थी नाही का? " माझ्या मनातल्या भावना तिला कळल्या होत्या.आठ-दहा दिवसातच मी पैशाचा बंदोबस्त केला.नयनासाठी ठेवलेले पैसे आणि एफ़.डी.मोडून मी सर्व पैसे घरी आणले.आणि कैवल्यची जाण्याची सर्व तयारी पूर्ण झाली.एफ़.डी.मोडताना एक लाखाची ती देखणी पिवळी गाडी माझ्या डोळ्यासमोर येत होती.गेले चाळीस वर्षे पाहात आलेलं स्वप्न हवेत विरून गेलं .ते पूर्ण होईल की नाही हे सांगता येणंही कठीण होतं.पण , त्याचवेळी एक नवीन स्वप्न डोळ्यात आकार घेत होतं...माझ्या मुलाच्या २५ लाखाच्या गाडीत बसण्याचं !


लेखक - सुनिल पाटकर
.....................

प्रपंच दिवाळी अंक २००९ मध्ये आयोजित केलेल्या शिर्षक कथा स्पर्धेत माझ्या नयना कथेची ६५० कथांमधून निवड झाली.











......