शनिवार, ३१ जुलै, २०१०

एक भटकंती अशीही

.
सोनलीकोंडला आम्ही सकाळी ८ वा पोहचलो. आंबिवली गणी आदिवासी वाडीवर चालत जायला तेथून रस्ता होता.गावातील एका घराच्या अंगणात आम्ही दुचाकी उभी केली.गावक-यांनी दाखवल्यानुसार आम्ही गणीचा रस्ता धरला.माझा मित्र सामाजिक कार्यकर्ता होता,त्यांनी आणि मी गणीवर जाण्याचा बेत आखला.सकाळी बिस्किटे व चहा एवढ्याच आहारावर मी घरच्या बाहेर पडलो.गणीला जाण्याचा मार्ग काट्याकुट्यातून ,डोंगरातून होता.पहिल्याच पाऊलवाटेवर सापाचे दर्शन झाले.वाटेवर मोरांची पीसे पडलेली दिसत होती. उन्हाळ्याचे दिवस असल्यांने थोडं जरी चालले तरी अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या.पाया खालचा सुका पालापाचोळा करर्कर वाजत होता.जंगलात गावक-यांनी गुरे मोकाट सोडलेली होती.मित्रा सोबत गप्पा सुरू असल्यांने चालणे पटकन होत होते. घामामुळे मी शर्टही काढून टाकला.डोंगर चढून झाल्यावर आम्ही एकदम पठारावर पोहचलो .आणि एकदाच आंबिवली गणी आदिवासी वाडीचे दर्शन झाले.तेथील एका मोठ्या वृक्षाच्या गर्द सावलीत बसून आम्ही थोडी विश्रांती घेतली , पठारावर वाहाणारा वारा अंगावर घेतला आणि तिथून गणीचं जीवनमान पाहिले.

एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करणारा भारत महासत्ता बनू पाहत आहे. महाराष्ट्र राज्य सुवर्णमहोत्सव साजरा करीत आहे; परंतु इतक्‍या वर्षांनंतरही महाड तालुक्‍यातील आंबिवली गणी या आदिवासी वाडीवर कोणत्याही मूलभूत सुविधा न पोहचलेल्या नाहीत. रस्ता, वीज, शाळा, घरकुले अशा सोईंपासून दूर असणारी ही वाडी सुवर्णमहोत्सव साजरा करणा-या महाराष्ट्रासाठी एक धक्काच आहे. हे मला स्पष्ट जाणवले.या माझ्या भटकंतीत मला जे जाणवले ते येथे मांडतोय.




. सरकारच्या आदिवासींसाठी अनेक योजना आहेत; परंतु आंबिवली खुर्द ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या गणी ही आदिवासीवाडी या योजनांपासून शेकडो कोस दूर आहे. दुर्गम भागात वसलेल्या या वाडीवर जाण्यासाठी पक्का रस्ता सोडाच; पण कच्चा रस्ताही नाही. चोचिंदे व सोनाली कोंड या दोन ठिकाणांहून वाडीवर जाता येते. वाडीवर जाणारी वाट डोंगराळ, निसरडी आहे. थोडासा जरी पाय सरकला तरी खाली घसरण्याची भीती आहे. दगड व काट्याकुट्यांतून जाणा-या या वाटेवर भरपूर सापही आहेत. डोंगरातील या वाडीवर जाण्यासाठी एक तास पायी प्रवास करावा लागतो. याच वाटेवरून आदिवासी, त्यांच्या महिला व लहान मुले ये-जा करतात. शहरातील रस्त्यांवर कोट्यवधी रुपये खर्च होतात; परंतु या वाडीला साधा कच्चा रस्ताही नाही. .
.एक वृद्धा लाकडाच्या मोळ्या बांधत होती.झोपड्यांत लहान मुलं , आदिवासी महिला ओल्या काजुबिया सोलत होत्या , उदरनिर्वाहासाठी कै-या, काजूच्या बिया, लाकूडफाटा गोळा करून, तो महाडच्या बाजारपेठेत विकायला आणला जातो. प्रचंड मेहनतीनंतर चार पैसे त्यांच्या हाती लागतात .या वाडीवर 12 कुटुंबांचे वास्तव्य आहे. त्यांची आठवी पिढी येथे राहत असल्याचे समजले. वाडीवर सरकारी योजनेतील एकही घरकुल नाही. गवताचे मंडप तयार करून, कुडामेढ्याच्या घरात आदिवासी राहत आहेत. काहींनी तर चक्क उघड्यावर आपला संसार थाटलेला आहे. इंदिरा आवास योजना त्यांच्यापर्यंत पोचलेलीच नाही. गावोगावी, वस्तीवस्तीवर शाळा हे सरकारचे धोरण; पण या वाडीवर शाळा नाही. मुलांसाठी अंगणवाडी अथवा प्राथमिक शाळा नाही. पायथ्याशी असणाऱ्या चोचिंदे व सोनाली कोंड या शाळांमध्ये लहान मुले चालत येऊ शकत नाहीत.
वाडीवरील काही मुले रत्नागिरी जिल्ह्यातील लाटवण व महाडमधील रेवतळे येथे शिकतात; परंतु तेथूनही काही पळून येतात. मुलींना शिक्षणच नाही. वाडीवरील मुलींचे शिक्षण झालेले नाही.पाच मुले शाळेतून बाहेर पडलेली आहेत. शिक्षण नसल्याने पुढच्या पिढीची प्रगतीही थांबलेली आहे.मुलामुलींची लग्न लवकर केली जातात. तालुक्‍यात 100 टक्के विद्युतीकरण झाल्याचा दावा "महावितरण' करीत असली तरी या वाडीवर कायम अंधार असतो. वीज सोडाच; परंतु विजेचे खांबही वाडीच्या जवळपास नाहीत. पाण्याची सोय एक किलोमीटर अंतरावर. तेथून पाऊलवाटेने त्यांना पाणी आणावे लागते.लहान मुलं डोक्यावरून पाणी आणतांना मी पाहिले. उन्हाळ्यात विहिरीचे पाणी आटल्यावर आदिवासींना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. डोंगराळ पठार असल्याने पावसाळी येथे शेती अथवा आंबा, काजू लागवडही होऊ शकते; परंतु शेती अवजारे, बैलजोडी, बियाणे, लागवडीसाठी मदत या सोई-सुविधा आदिवासींपर्यंत पोचत नाहीत. सरकारी अधिकारी वाडीवर कधी जात नसल्याने आदिवासींच्या अडचणी व गरजा यांची सरकारदरबारी दखल घेतली जात नाही.
वाडीवरची सारीच परिस्थिती भायावह अशी होती.माझ्या मित्राने वाडीवर आदिवासी कुटुंबाच्या नोंदी व इतर सर्व्हेक्षणाचे काम सुरू केले.तब्बल ३ तासानंतर आम्ही वाडीवरुन खाली उतरलो.परततांना आदिवासीं बांधवांनी दिलेल्या कै-या आमच्या सोबत होत्या.स्वत:विक्रीसाठी ठेवलेल्या कै-यातील काही कै-या त्यांनी आम्हाला फुकट दिल्या.आग्रह करुनही त्यांनी पैसे घेतले नाही.रस्ता, वीज, शाळा, घरकुले कोणत्याही मूलभूत सुविधा न पोहचलेल्या या वाडीवर इतकी माणुसकी मात्र पोहचली होती.

बुधवार, २८ जुलै, २०१०

राजे

राजे असा कंटाळा करून चालणार नाही
माझ्याशिवाय तुमच्याशी
खरे कुणीच बोलणार नाही
’गाईड’होण्याची संधीही
मी कशाला हुकवतो?
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो

सुरूवात शिवनेरीपासून?
की,रायगडापासून करायची?
उलटी की सुलटी?
कोणती मळवाट धरायची?
असे कोड्यामध्ये पडू नका,
कुणालाच उपदेश नको,
"आपापसात लढू नका"
तेव्हाही पटले नाही,
आत्ताही पटणार नाही.
मरतील पण सवयीपासून
मागे कुणी हटणार नाही.
म्हातारीच्या मरणाने
काळ बघा कसा सोकावतो?
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो..

शिवबा घडवायचा असेल तर
त्यासाठी जिजाऊ असली पाहिजे
शहाजीच्या मनामध्ये
ही आस ठसली पाहिजे.
पण आजकाल हे सारे
घडताना दिसत नाही
तुमचे चरित्र वाचायला गोड वाटते
पण पचनी पडताना दिसत नाही.
पोकळ मराठी बाणा तर
बघा स्वत:लच फ़सवतो
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

ते बघा नवे देशमुख,
ते बघा नवे देशपांडे,
वतनदारीसाठी टपलेले आहेत
त्यांच्या आतली काळी माणसं
खादीमध्ये लपलेले आहेत.
पराक्रमाला तोड नाही
कर्तुत्वाला जोड नाही
महाराष्ट्राच्या भल्याची
स्वार्थापुढे ओढ नाही
म्हणूनच तर सह्याद्री
आपला माथा झुकवतो
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

ज्यासाठी जान की ’बाजी’ लावावी
तोच खिंडीमध्ये गाठतो आहे
पिसाळांचा सूर्याजी तर
इथे दर फ़ुटा-फ़ुटाला भेटतो आहे.
"आधी लगीन कोंढाण्याचे"
म्हणण्याची
आज तानाजीत हिंमत नाही
बापजाद्यांच्या पराक्रमांची
आज रायबाला किंमत नाही.
इतिहास राहिला नाही
जो तो सोईप्रमाणे
आज इतिहासाला वाकवतो.
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

आपलेच आपल्याला लुटायला
लागले
परक्यांची आवश्यकता नाही
परक्यांनीच लुटले पाहिजे
हा काही त्यांचाच मक्ता नाही.
डोळे मिटलेल्या मांजरीचे
सारे नखरे कळत आहेत
मनातल्या मनात शायिस्तेखानाची
बोटे अजून वळवळ्त आहेत.
आपलाच गनिमी कावा
बघा आपल्यालाच कसा चकवतो?
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

तो बघ प्रतापगड सांगतोय,
इथेच पराक्रम घडला होता.
अफ़जुल्याचा कोथळा
बाहेर पायथ्याशी पडला होता.
अजूनही अफ़जुल्या
तो पराक्रम सांगतो आहे.
आम्ही आमची अक्कल
उगीच वेशीला टांगतो आहे.
मेलेल्यांशी वैर धरून
कुणी अफ़वा इथे पिकवतो
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

तो बघा ज्याचा प्रदेश,
तिथेच त्याचा किल्ला आहे.
इष्टप्रधान मंडळाचा
फ़ायदेशिर सल्ला आहे.
ज्याचा त्याचा झेंडा आहे
ज्याची त्याची राजमुद्रा आहे.
सुखी माणूस तोच,
ज्याच्या अंगी खादीचा सदरा आहे.
डोक्यावरून पाणी चाललेय
जो तो आपल्यापुरते चुकवतो
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

शिवा काशिद,मुरारबाजी,
नेताजी,हिरोजी आणि मदारी
आता भेटाण्याची आशा नाही.
जीवाला जीव देण्याची,
मावळ्यांना आता नशा नाही.
खूप झाल्या सेना,
खूप झाले सेनापती,
सैनिका-सैनिकांची वाटणी आहे.
वाईट वाटण्याचे कारण नाही,
आजच्या राजकारणाची
हीच धाटणी आहे.
निष्ठा दाखवायची खुमखुमी येता
पटकन डिजिटल ब्यानर डकवतो
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

पुरंदरच्या तहाची परंपरा
आजकाल जोरात पाळली जाते.
परस्परांचा फ़ायदा असेल तर
राजकीय लढाईही टाळली जाते.
राजकीय मांडवली झाली की,
पाच वर्षापुरते तरी भागते.
राजे,छाव्याला जामीन ठेवायला,
वाघाचे काळीज लागते.
दुसर्याच्या जळत्या घरासामोर
आज आम्ही आपले कपडे सुकवतो.
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

राजे,यांना शहाणे समजू नका,
हे तर चक्क बावळे आहेत.
तुम्हाला केलेय देव त्यांनी,
तुमची इथे देवळे आहेत.
लाज वाटते म्हणून सांगतो,
आम्ही पदरचे रेटत नाही.
तुळजा भवानीने तलवार दिलीच कशी?
आमच्या बंडखोर मनाला पटत नाही.
खरा इतिहास राहिला बाजूला,
ओळखा कोण ह्या कंड्या पिकवतो?
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

शेतकर्यांची अवस्था अशी की,
जसा वेढ्यामध्ये पन्हाळा आहे.
बारा महिने तेरा त्रिकाळ
त्यांच्या आयुष्य़ात उन्हाळा आहे.
राजे,चूकुनही बघू नका
त्यांची अवस्था कशी आहे?
विषासाठी पैसा नसेल तर
घराच्या आढ्याला फ़ाशी आहे.
व्याजाने व्याज वाढत जाते
तरीही विचारतात,
हप्ता का थकवतो ?
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

सरकार म्हणाले शिका,
पोरं इथले शिकले आहेत.
शिक्षणाची दुकाने तर
वढ्या-वघळीला टाकले आहेत.
सिंहगडाखालचा पराक्रम तर
खरोखरच बघण्यासारखा होता.
रेव्ह पार्टीच्या थोबाडावर
उच्चभ्रुपणाचा बुरखा होता.
येतील तसे दिवस
आपला महाराष्ट्र धकवतो.
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

जसे राजकारणाचे,
तसे साहित्याचेही झाले आहे.
सहकाराला स्वाहाकाराचे
बकासुरी रूप आले आहे.
आया-बहिणींच्या इज्ज्तीची
समस्या तर जटील आहे.
नाक्या-नाक्यावर उभा
जणू रांझ्याचा पाटील आहे.
लोकशाहीचा पाईक मी,
तुमच्या राजेशाहीसमोर
माझा माथा टेकवतो.
राजे, चला
मी तुम्हाला
तु तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

दैवी चमत्कार `वाळणकुंड `


कोकणात निसर्गाचे तसेच अनेक दैवी चमत्कार पहावयास मिळतात. काही चमत्कार तर तोंडात बोटे घालायाला लावणारे असतात.रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील वाळणकुंड हे ठिकाण अशाचा एक चमत्काराचे प्रतीक मानावे लागेल.खास माशांसाठी प्रसिद्ध असलेले वाळणकुंडातील हे मासे देवाचे मासे म्हणून परिचित आहेत. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत काळ नदी उगम पावते डोंगरातून वहात येणारे तिचे पाणी वाळण गावा अलिकडे सपाटीला लागते.खडकात मोठी घळ करुन एक डोह तयार झाला आहे. काळ नदीच्या या डोहात हे कुण्ड आहे .यालाच वाळणकुंड अथवा वाळणकोंडी म्हणतात.येथील पाणी कधीही आटत नाही ऐन उन्हाळ्यात हे मासे आपली जागा सोडून कोठेही जात नाहीत.पावसाळी नदीचा प्रचंड प्रवाह माश्यांवर काहीही परिणाम करु शकत नाही .नदीवर येथे झूलतापूल बांधालेला आहे त्यावर उभे राहून हे मासे पाहता येतात. डोहात खाण्याचा पदार्थ टाकला कि प्रथम लहान व नंतर मोठे मासे वर येतात .माश्यांचे एकूण सात थर खालून वर येत असतात.माश्यांचे मस्तक शेंदरी रंगाचे असते.लहान मुलांना या ठिकाणी मनमुराद आनंद लुटता येतो.नदीकाठी वरदायिनी मातेचे मंदिर आहे हे देवस्थान कड़क मानले जाते.या भागातून जाताना चप्पल काढून चालाण्याची प्रथा आहे.वाहनचालक वाहने चालवतानाही चप्पल काढतात.येथील मासे कोणीही कधीही मारत नाही महाड़ पासून सुमारे २० कि.मि.अंतरावर वाळणकुंड आहे .थंडीच्या हंगामात शांत असलेल्या या रस्त्यावर रंगीबेरंगी अतिशय सुंदर फूलपाखरं पहावयास मिळतात.झूमचा कँमेरा असेल तर फूलपाखरांना कँमेर्‍यात बंद करता येईल.पावसाळ्यानंतर रस्त्याकडेला रानफूलांचे मळेच फुललेले असतात.ही फूलं पाहतांना जाईन विचारीत रानफूला ‘ हे गाणे आठविल्या शिवाय रहात नाही.येथे थेट वाहन जाते.चालण्याची अजिबात गरज नाही.

तर वाट कसली पहाताय ...चला निघा वाळणकुंडीला ...... येथे राहण्याची खाण्याची सोय नाही तेव्हा येथे येतांना सर्व खाणे-पिणे सोबत आणावे..येथून जवळच रायगड , शिवथरघळ अशी भटकंतीही करता येते.ट्रेकर्ससाठी कडसरी लिंगाणा हा गडही जवळच आहे.

अप्रतीम गांधारपाले लेणी


मुंबई -गोवा महामार्गावर गोव्याकडे जातांना डाव्या बाजूला डोंगरात कोरलेली लेणी दिसतात आणि नजर स्थीर होते.गाडी रस्त्याकडेला उभी करावी आणि पायर्‍या चढून सरळ लेण्यांच्या दिशेला वळावे .अगदी जवळचं ही लेणी आपल्या स्वागताला तयार असतात
कोकणामध्ये अनेक लेणी आपणास पहायला मिळतात.मुंबई -गोवा महामार्गावर महाड जवळ गांधारपाले येथे डोंगरात कोरलेली अप्रतीम लेणी पहावी अशीच आहेत.इ.स.पूर्व १५०-२५० या कालखंडात गांधारपाले गावाचा उल्लेख पालीपट्टण अस होत असे. डोंगरात दोन स्तरामध्ये ही लेणी खोदलेली आहे.लेण्यांच्या मूळ रेखांकनावरून लेणी हिनयान काळातील असल्याचे इतिहास तज्ञांचे मत आहे.लेण्यातील सर्व खोल्यांची संख्या २९ आहे.पहिल्या वरच्या स्तरात १ ते २० आणि दुसर्‍या स्तरात २१ ते २९ अशी लेणी आहेत.सर्व लेणी पूर्वार्भिमुख आहेत.लेण्यात बसण्यासाठी दगडी बाके तयार केलेली दिसतात.२/४ खोल्या मिळून पाण्याची व्यवस्था केलेली पहावयास मिळते.ध्यानधारणेसाठी खोल्या व प्रार्थना घरे, अनेक लोकांना बसता यावे या साठी भव्य सभागृह या लेण्यात आहे.लेण्यांच्या काही खोल्यांतून पाली भाषेतील शिलालेख पहावयास मिळतात.लेणी क्र.१ मध्ये भव्य सभागृह आहे.एका शीळेवर प्रलंबपदासन मुद्रेतील बुद्धमूर्ती आहे.सिंहासनावर भगवान बुद्धाच्या पायावर धम्मचक्र व हरिणाची प्रतिमा आहे.दोन्ही बाजूस दोन चामरधारी व वरच्या बाजूस दोन विद्याधर आहेत.यावर मकरतोरणाचे नक्षीकाम आहे यालेण्याच्या पुढील भागात पाण्याची तीन टाक्या आहेत. लेणी क्र.९ हे लेणे चैत्यगृह असून येथील सर्वात लक्षवेधी वास्तुशिल्पकाम येथे दिसून येते.या लेणीत एक शिलालेख आहे.राजपुत्र कान्यभोज, विष्णूपनीत असे नामोल्लेख आढळतात.लेणी क्र.२७ मध्ये प्राकृत ब्राह्मी शिलालेख कोरलेला आहे. शिलालेखात वादसिरी.संघरखित ,गृह्पती श्रॆष्ठी या व्यक्ती नामांचा समावेश दिसतो. खोल्या सभागृह,दिर्घिका, स्तंभ ,
अर्धस्तंभ ,.चैत्यगृह ,शिलालेख ,ओटे, वेलबुट्टी ,नक्षीकाम.लहान मोठी प्रवेशद्वारे,भोजनगृह,स्तूप,गाभारा,दगडी पाण्याची टाके,प्रतीमा,असे सुंदर कोरीवकाम या लेण्यांमध्ये पहावयास मिळते.पर्यटक ,अभ्यासक, इतिहास संशोधक यांना ही लेणी अतीव आनंद देणारी अशी आहेत.महामार्गावर असल्याने येथे यायला फारसे कष्ट करावे लागत नाहीत.पावसाळ्यात लेण्यांच्या वरून पडणारे धबधबे ,समोर सावित्री-गांधारी नद्यांचा विस्तिर्ण जलाशय...हे दृश्य ही मनमोहक असते.कोकणात ,रायगड ,महाबळेश्वर नाहीतर गोव्याकडे जातांना थोडावेळ इथे थांबा आणि ऐतिहासिक शिल्पकलेचा सुंदर नमुना पाहून जा.

सुवर्ण गणेशाचा वरदहस्त -दिवेआगर

निळाशार अथांग समुद्र ,गर्द माडाची बने, आणि नारळ सुपारीच्या झावळ्यात लापलेली ती सुन्दर कौलारू घरे …गावातून जाणारे सुन्दर रस्ते दुतर्फा हिरवाइने नटलेले.. कौलारू घरांबरोबर उठून दिसणारे काही टुमदार बंगले …असा रमणीय निसर्ग लाभालाय॥, तो दिवेआगर गावाला।
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे एक छोटसे गाव। अलिकडे पर्यटनस्थळ म्हणून विकसित होतेय ।निसर्गाने दिलखुलासपणे दान दिलेल्या दिवेआगाराला परमेश्वराचाही वरदहस्त लाभाला आहे .येथील मुख्य आकर्षण आहे सुवर्ण गंणेश . द्रोपदी पाटिल या महिलेच्या बागेत जमीन खोदण्याचे काम सुरु असताना एक लोखंडी पेटीत गणपतीची सोन्याची मूर्ती सापडली .सुमारे १००० वर्षापूर्वीची ही मूर्ती असुन ५२ कशी सोन्याची १.३२ कि वजनाची आहे. १७-११-१९९७ रोजी ही मूर्ती सापडली सोबत काही सोन्याचे दागीनेही होते चमत्कार म्हणजे १७-११-९७ या दिवशी संकष्टी चतुर्थी होती .मराठीतील पहिला ताम्रपटही दिवेआगरमध्ये सापडला आहे. या निसर्गरम्य गावाला अरबी सागाराचा ५ कि।मि.चा अतिशय सुन्दर,स्वछ आंणि सुरक्षित किनारा लाभाला आहे.या किनार्‍यावर केवाड्याची बने आहेत .या गावात एकुण पाच ताम्रपट व एक शिलालेख सापडला आहे.सुवर्ण गणेश सापडलेल्या बागेत मराठीतील पहिला ताम्रपट सापडला आहे .येथील सुपारी सर्वोत्तम सुपारी मानली जाते .येथे विविध प्रकाराची फुलझाडे आहेत.अनेक रंगांच्या जास्वंदीची फूले व पपनासाची फळे पहावयास मिळतात .दिवेआगारचे नारळपाणीही दिवेआगारमध्ये माघ.शु.चार ला गंणेश जन्मोस्तव तर सुवर्ण गंणेशाचा प्रकटदिन कार्तिक वद्य ४ ला साजरा होतो. सिद्धनाथ , केदारनाथ यांच्या चित्र महिन्यात होणार्‍या यात्रेमध्ये माणसाच्या पाठिला गल टोचून गरागरा फिरवले जाते.हां खेळ पाहाण्यासाठी मोठी गर्दी होते. दिवेआगरमध्ये रुपनारायाण ,उत्तरेश्वर ,पंचमुखी महादेव यांची मंदिरे पाहण्याजोगी आहेत.
दिवेआगरमध्ये राहण्यासाठी एम.टि.डि.सी ,व खाजगी हाँटेल आहेत.घरगुती जेवण व राहण्याची सोय आहे
...............................
.Diveagar Beach  and Suvarnaganesha Temple:

Diveagar Beach is located approximately 170 kilometers south of Mumbai. The beach is accessible from the Mumbai-Goa highway
Diveagar beach is or approximately six kilometers long. At one end of the beach is a fishing settlement, while the other end has a sanctuary of migratory seagulls.
The beach contains a number of Suru trees (Casuarina), which are common to coastal Maharashtra. The access to the beach has a dense cover of Belu trees, which are otherwise uncommon in the area.
Another major attraction in Diveagar village is a temple of Lord Ganesh. The idol has a mask which is made of pure gold. This mask was discovered by Mrs Patil, a few decades back buried along with other treasure in a thick copper trunk in her beetel farm, opposite Abhynkar's House.
Diveagar is a popular beach destination along with nearby towns of Shrivardhan Origin of the Peshwas and Harihareshwar.
Sand Bubble Crabs can be found on the beach and at nearby Harihareshwar one can find Dolphins.

आजीची भातुकली


भातुकली...आजच्या इंग्रजी माध्यमात ,संगणक युगात वावरणा-या मुलांना हा शब्द माहितही नसेल .परंतु एकेकाळी या शब्दाभोवती लहान मुलांचे भावविश्व गुंफलेले होते.एकत्रित जमण्याचे मैत्री वाढविण्याचे संकेत भातुकलीचा हा खेळ मुलांना द्यायचा.काळनुसार खेळही बदलले.जुन्या पिढीचे ते खेळ ,भातुकलीतील ती चिमुकली भांडी , १०० वर्षांपूर्वी वापरात असणा‍र्‍या त्या वस्तू..आपल्याला आजही पहावयास मिळतात.
पुणे येथिल विलास करंदीकर यांनी २० वर्षांपासून अशा वस्तू जमवल्या आहेत. त्याच्याकडे १ हजाय २५०
भातुकलीची खेळणी .लहान चूल ,घुसळण,पाटा-वरवंटा,पोहरा ,उखळ,ताक घुसळणारी बाई ,दळणारी बाई,पाण्याचा बंब,अडकित्ता,दूध ठेवण्याचे कपाट.सागर्गोते, सारिपाट .काचपाणी.बिट्या, डबा ऐसपैस असे खेळ
पहावयास मिळतात.विलास करंदीकर अनेक ठिकाणी आजीची भातुकली नावाने या वस्तूंचे प्रदर्शन भरवत असतात.गिनिज बूक व लिम्का बूकने याची दखलही घेतली आहे.

पाऊस - कवीच्या मनात दडलेला

कधी रिमझिम ,कधी मुसळधार,कधी वादळवा-यासह तर कधी उन्हाची सोबत घेऊन कोसळतो पाऊस।पावसाचे रंग तरी किती वेगवेगळे...मनसोक्त भिजणारी ,पावसाचे तुषार एकमेकांच्या अंगावर उडवत चालणारी लहान मुलं पाहिली कि गँलरीत उभ्या असणा-या आजोबांचा हातही नकळत पाऊस झेलण्यासाठी बाहेर येतो.नटूनथटून बाहेर पडणा-या गृहिणींच्या तोंडी ‘याला आत्तच पडायचं होतं का ?‘ असा तक्रारीचा सूरही बाहेर येतो‘जरा आल्याचा चहा करा ‘ अशी फर्माईश हाँलमधून स्वयंपाकघरापर्यंत धडकते.एका छत्रीत थोडाथोडा पाऊस अंगावर झेलणा-या प्रेमीयुगलांचा आनंद आणि हिरवीगार बहरलेली शेते पाहून वरुणराजाचे आभार मानणारा शेतकरी या सर्वांचा आनंद काही औरच ! असा हा पाऊस प्रत्येकाच्या मनात दडलेला असतो.लहानपणीच्या ईवल्याश्या छत्रीत....मित्रांसोबत सोडलेल्या कागदी होड्यांत..., तरुणाईत धबधब्याखाली लुटलेल्या त्या मजेत...असा हा पाऊस॥कुणाच्या अंगणात तर कुणाच्या गँलरीत मनसोक्त धडकणारा.सृष्टीला नवचैतन्य देणा-या प्रत्येकाला वेड लावणा-या या पावसाला शब्दांच्या घट्ट मुठीत कुणी पकडले असेल तर ते कवीने. आपल्या सुंदर शब्दामध्ये पावसाला बंदिस्त करण्याचे धाडस फक्त हा कवीच करु शकतो.म्हणूनच मराठी कवितांमध्ये, गाण्यांमध्ये या पावसाची विविध रुपं उलगडत गेलेली दिसतात. पाऊस जसा वर्षानुवर्षे पडतोय ,पडत राहणारही आहे तसतसे हे बालगीतही प्रत्येकला आपल्या बालपणात भेटत राहील.
येरे येरे पावसा ,तुला देतो पैसा,
पैसा झाला खोटा , पाऊस आला मोठा
हे बालगीत लहानपणापासूनच मनात पक्क बसतं.हे बालगीत गुणगुणतच आपल्याला पावसची ओळख होते.शाळेत जातांना पावसाच्या पाण्यात खेळण्याचा आनंद कायम रहावा आणि शाळेला सुट्टी मिळावी यासाठी बालमने
सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?

शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ?

अशी आर्जव करतात. बालमनातील ही इच्छा पाडगावकरांनी किती अलगद पकडली आहे पहा.मंगेश पाडगावकरांनी आपल्या कवितेत
जांभळासारखे पिकून आले,
ढग हे टपोरे झुकून आले.
सरी नी सरी झडेल रे,
पाऊस पाऊस पडेल रे.
असे पावसाचे वर्णन केले आहे.तर पावसाळी वातावरणाची शब्दरूपी मांडणी बा.भ.बोरकरांनी फार सुंदररित्या केली आहे.
गडद निळे, गडद निळे जलद भरून आले
शितल तनू, चपल चरण ,अनिल गण निघाले.

बोरकरांची ही कविता आजही प्रत्येकाच्या ओठावर आहे. पावसाचा आनंद जितका लहान मुलांना होतो तितकीच काळजी घराबाहेर पडलेल्या आपल्या पतीची एका पत्नीला असते.प्रत्येकाच्या घरामध्ये सहजपणे जाणवणारे हे दृश्य कवी अनिल यांनी फार सुंदर रेखाटले आहे.

बाई या पावसानं लावली झिमझिम
भिजली की माळरान ,उदासल मन ,
नदी नाले एक झाले ,पूर भरूनीया आले
जीवलग पडे बाई कुठे अडकून,
नच पडे चैन बाई य जीवाला

एका बाजूला पतीची काळजी करणारी व्याकुळ पत्नी तर दुसरीकडे पावसात मनसोक्त भिजण्या-या तरुणीचा ओसंडून वाहणारा आनंद शांता शेळके यांनी शब्दामध्ये अगदी सहज पकडला आहे.

आला पाऊस मातीच्या वासात गं
मोती गुंफीत मोकळ्या केसात गं.

मुसळधार पडणारा हा पाऊस गुलाबी असा गारवा घेऊन येतो आणि या गारव्यात गरमागरम चहा आणि भजी खाण्याची इच्छा अनावर होऊन जाते.आद्य कवियत्री बहिणाबाईंनी प्रत्येकाच्या मनातील इच्छा केव्हाच ओळखली.आणि ती शब्दात पकडूनही ठेवली.

येता पाऊस पाऊस .पावसाची लागे झडी
आता खा रे वडे , भजे
घरामध्ये बसा दडी
बहिणाबाई पावसाबद्दल पुढे असं म्हणतात.

देवा पाऊस पाऊस , तुझ्या डोयातले आस
देवा तुझा रे आरास, जीवा तुझी रे मिरास

नव्या दमाचे कवि संदीप खरे यांनी पावसाला आगदी सुंदर सोप्या भाषेत शब्दबध्द केलय

गोष्ट सुरू होईल ,तेव्हा सुरू झाला पाहिजे
गोष्ट वाचून होईस्तोवर पडला पाहिजे.

असा हा पाऊस..अनेक कवींना जसा तो दिसला ,भावला त्यांनी अनुभवला तसा तो त्यांनी शब्दबध्द केला.असा हा पाऊस..कधी अचानक गायब होणारा , बळीराजाला आभाळाकडे पहायला लावणारा तर कधी सारे काही जलमय करून टाकणारा.कुणाला तो हवाहवासा वाटतो.. तर कुणाला कंटाळवाणा.विद्यार्थ्यांची शाळा बुडवणारा..तरुणांना प्रेमात पाडणारा ,वृद्धांना गारठवणारा तर आईला काळजीत टाकणारा.त्यांने अनेकांना सावरलं तर अनेकांना उध्वस्तही केलं. असा हा पाऊस..तो कसाही असला तरी मराठी कवितांच्या पुस्तकांच्या पानावर कवीच्या शब्दातून तो बरसत राहिला आहे आणि पुढेही बरसेल.

शनिवार, २४ जुलै, २०१०

नयना

एक लाखाच्या त्या छोट्याशा गाडीने टि।व्ही.चा छोटा पडदा अगदी दिवसभर व्यापून टाकला होता.ती कशी असेल ? कशी दिसेल ? तिचा रंग काय असेल ? अशा अनेक प्रश्नांचा भडिमार आणि त्यांची उत्तरे यांनी हा छोटा पडदा व्यापून गेला होता.आणि त्याही पेक्षा, कित्येक पटीने आँफिसमधल्या माझ्या सारख्या अनेकांच्या मनाचे पडदे तिने काबीज केले होते.दिवसभर लोकल मध्ये लोंबकळणारे,बसच्या रांगेत तासनतास उभे राहून प्रवास करणारे , गळ्याला टिफिन अडकवून आँफिसला पळणारे माझ्यासारखे अनेकजण ,त्यांची अनेक वर्षे उराशी असणारी स्वप्नं या गाडीने पुन्हा जिवंत केली होती.बाकी आम्ही मध्यमवर्गीय... ! स्वप्नांवर जगणारे ,स्वप्नातच रममाण होणारे !स्वप्नात आम्ही कधी तेंडूलकर होतो आणि सामना जिंकून देतो. कधी आम्ही अमिताभ होतो आणि ‘आज भी मै फेके हुए पैसे नही उठाता ’असे म्हणत स्वाभिमानी होतो.एखादी सुंदर तरूणी आमच्या प्रेमात पडते तिला आम्ही ताज मध्ये जेवायला.स्वप्नात !.नाहीतर माँरिशीसच्या एका रमणीय बेटावर निवांत झोपून ज्यूस पितो हे देखिल स्वप्नातच ! पण आम्हा मध्यमवर्गीयांना स्वप्नपूर्तीचा आनंद मिळवून देणाचं काम केलं ते नितीन छ्ड्डाने ! छोट्या का होईना पण,स्वत:च्या कारमध्ये आपल्या पत्नीमुलांसह बसण्याचं भाग्य मिळणार होतं.खरंतर ही कल्पनाही पुढील काही दिवस सुखात जगण्यासाठी आम्हाला पुरेशी होती.तसा माझा संबंध लहानपणीच काय तो गाड्यांशी आला होता.काका मामांनी आणून दिलेल्या जत्रेतील त्या छोट्या गाड्या फिरवता-फिरवता मी लहानाचा मोठा झालो.अगदी माझ्यासारख्या इतर मध्यमवर्गीयांसारखा !.पण ,टि.व्ही वर अनेक दिवस दिसणार्‍या त्या छोट्याशा गाडीने लहानपणीची आवड पुन्हा मनात निर्माण केली होती.तिच नावही अगदी सुंदर होतं ‘ नयना ’खरंच !नितीन छ्ड्डाने आम्हा मध्यमवर्गीयांना गाडीत बसविण्याचा विचार जर केला नसता तर आँफिस बाहेर उभ्या असलेल्या रंगीबेरंगी गाड्या पाहण्यात आमचं उभं आयुष्य गेलं असतं.!गेले दोन दिवस टि.व्ही वरच्या त्या बातम्या मीही पहात होतो.एकदाची पिवळ्या रंगाची नयना मला दिसली.पहिल्या नजरेतच मी तिच्या प्रेमात पडलो आणि मनाशी पक्का निश्चय झाला , नयनाला घरी आणायची .गाडी अगदी रोडवर येईपर्यंत दिडलाख गेले तरी चालतील पण, नयना दारात उभी राहिलीच पाहीजे ! गाडीत बसण्याचं आपलं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे !तसं लहाणपणापासूनच मला गाड्यांचं खूप आकर्षण. माझ्या एका मित्राच्या वडिलांची त्या काळी गाडी होती.त्या गाडीतून मित्राबरोबर शाळेत जाण्याचा योग कधी - कधी यायचा.सुट्टीत त्याच्या घरासमोर उभ्या असलेल्या बंद गाडीत आम्ही खेळतही असू.माझ्या वह्यांमध्येही गाड्यांचे फोटो असायचेत्या वेळी गाड्या कमी होत्या. पण काँलेजला गेल्यावर ही आवड वाढली.मी चारचाकी चालवायला शिकलो.आयुष्यात एकदा तरी गाडी घ्यायची,त्यातून मनसोक्त फिरायचं आणि वाटलं तर नंतर विकून टाकायची.पण,गाडी घ्यायचीच ! गाडी घेण्याची इच्छा अजूनही कायम होती.परिस्थिमुळे शिक्षण अर्धवट राहिले.सुदैवाने मुंबईत चांगली नोकरी मिळाली.माझ्या कार्यालयात माझ्या सारखे अनेक जण होते नी ते सुद्धा ही लाखाची गाडी घेण्यासाठी उत्सुक होते.आमच्या कार्यालयात ही नयना एक चर्चेचा विषय झाली होती.देसाई म्हणाला "बापट,बायकोला कालच बजावलय आपल्याला कुठलंही व्यसन नाही,आता तु विघ्न आणू नकोस ,मी गाडी घेणार आहे."तर सुर्वे कार्यालयामध्ये पहिली गाडी आपली असणार हा निश्चयच करून आला होता."पण,त्याने प्रदुषण हूणार आहे .पार्किंगची समस्या निर्माण होणार आहे " गोडबोले मँडम फाईलमध्ये डोकावत म्हणाल्या.त्यांच्या या वाक्यावर माझा पारा चढला." कसलं आलयं प्रदुषण ? बाकीच्या गाड्यांनी काय प्रदुषण होत नाही.गरीबांची गाडी आली ना, मग पार्किंग काय , प्रदुषण काय ? सारं काही दिसेल .हे श्रीमंतांचे शोध , त्यांनीच फक्त गाड्या चालवायच्या काय ?"माझा राग पाहून सारे थोडावेळ गप्प राहिले." हे अगदी बरोबर बोललात आण्णा " शिंदे शिपाई ओरडला.आँफिस,ट्रेन, बस, सोसायटीमध्ये या एक लाखाच्या गाडीची चर्चा रंगत होती.घरीही माझ्या डोक्यातून हा विषय जाईना."हे बघ काय लिहिलयं पेपरात,म्हणे या गाडीचा आवाज मोठा आहे" एवढ्या मोठ्या पेपरात माझं लक्ष त्याच बातमीकडे गेलं."काय झालं मोठा आवाज असेल तर ? ट्रक ,डंपरच्या नसतो मोठा आवाज "माझ्या या बडबडीकडे बायको शांतपणे पहात होती.माझा त्रागा पाहून ती म्हणाली "तो गाडीचा विषय सोडून इतर विषयांवर बोलाल का तुम्ही.घर नाही ,आँफिस नाही बघावं तेव्हा गाडी गाडीन गाडी.थोडं मन शांत ठेवा ."बायकोचा आवाज ऐकून मी थोडा शांत बसलो .थोड्यावेळानं मी तिच्या जवळ बसलो." तुला काय वाटतं आपण नयना घ्यावी ?माझं लहानपणापासूनच स्वप्न होतं स्वत:च्या गाडीत बसायचं " माझा चेहरा पाहून बायको हसली."कैवल्य पण करत नव्हता कधी असा हट्ट.तसं तुम्ही इतके वर्षात स्वत:साठी काहीच केलं नाहीत. तुम्हाला आवडली आहे ना, घ्या गाडी. पण,पैशाचं काय?""आहेत पैसे. रिमाचं लग्न झालयं , ती जबाबदारी आता नाही ,ब्लाँकचे हप्ते संपलेत .रिमाच्या लग्नाला अपेक्षेपेक्षा कमी खर्च आला. मी पैसे काढून ठेवलेत बाजूला ,आपली ओढाताण होणार नाही."माझ्या बोलण्यावर ती सुखावली.माझ्या मनाची तळमळ तिला कळली होती." हे बघा, आता गाडी घ्यायची नक्की झालयं.यापुढे घरी ,बाहेर ,टि.व्ही वर गाडीचा विषय बंद.बुकिंग सुरू होईल तेव्हाच या विषयावर बोलायचं,समजलं ?"बायकोने हसतहसतच मला दम दिला.त्यानंतर गाडीचा विषय आमच्या घरी क्वचितच निघे.दरम्यान गाडीसाठी लागणारे दीड लाख रुपये मी वेगळे काढून ठेवले. माझी नोकरी ,त्यात ब्लाँकचा हप्ता मुलांची शिक्षण ,प्रपंचाच्या या रगाड्यात गाडी घेण्याचा विषय कधिच मागे पडला होता॥पण आता सारं स्थिरावलं होतं मुलगा इंजिनिअर झाल्यावर अंधेरीच्या एका कंपनीमध्ये नोकरीला लागला होता.भावाची मुले स्थिरावल्याने गावीही पैसे पाठविण्याची चिंता नव्हती.कैवल्य नोकरीला लागल्याने माझाही प्रापंचिक भार कमी झाला होता.त्याच्या इतर मित्रांप्रमाणे तोही अमेरिकेला जाण्याच्या मन:स्थितीत होता.आम्ही गावाहून तालुक्याला ,तालुक्याहून मुंबईत आलो.आताची पिढी मुंबईतून अमेरिकेला जाण्याआठी उत्सुक आहे.नेटवर बसून कैवल्यचे काहीनकाही सुरू असायचे.परदेशी नोकरीसाठी नेटवरून तो बायोडेटा पाठवित असे.त्यांने घरी न सांगताच पासपोर्टही काढला होता. पासपोर्ट आल्यानंतर आम्हाला कळलं आमचे चिरंजिव परदेश गमनाची तयारी करत आहेत ! एक दिवस आपला मुलगा सातासमुद्रा पलिकडे जाणार हे मी माझ्या मनाला समजावलं होतं.आँफिसमधील सहकारी म्हणायचेही "बापट ,रिटार्यमेंट्नंतर अमेरिकेत जाण्याचा योग आहे तुझ्या नशिबात." आणि माझी मान अभिमानाने उंचावायची.बरेच दिवस मागे पडलेला नयनाचा विषय पुन्हा अचनक चर्चेत आला तो नयना शोरुमला आल्याने ! ‘नयना शोरुमला दाखल ’ अशा बातम्या वृत्तपत्रात झळकल्या आणि गाड्यांची शोरुम गर्दी खेचू लागली.फक्त एक लाख लोकांनाच नयना मिळणार म्हणून माझ्या सारखे अनेक जण हिरमूसले.शेवटी इथेही नशिबाचा भाग होताच.बायकोला नेऊन नयना दाखविली.तिला गाडी आवडली.चांगला गुरुवार पाहून ३ हजार रुपये भरून नयना बुक केली.माझ्या आयुष्यातील तो एक आनंदाचा क्षण होता.पण त्या बरोबर एक काळजीही होती एक लाख लोकांत आपला नंबर लागेल ना ?.पण , बायकोने दिलासा दिला ".इतकी वर्षे गाडीच स्वप्न पाहताय, आपल्याला गाडी नक्की मिळेल."बुकिंगनंतर काही दिवस पिवळ्या रंगाची ती इवलिशी नयना मला डोळ्यासमोर सारखी दिसत असे.सहा महिन्यात नयना आपल्याला खरेदी करावी लागेल याचा अंदाज बांधून मी पैशाचे नियोजन केले होते .पावसाळ्यातील चार महिने बघताबघता निघून गेले आम्ही गाडी बुकिंग केल्याची बातमी सर्व नातेवाईकांत वार्‍यासारखी पसरली होती.अन एक दिवस कैवल्यने घरी बाँम्ब्च टाकला."पप्पा ,मला जाँब मिळतोय यु.एसला ,काय करू ?"त्याच्या या वाक्यावर मी आणि पत्नी त्याच्याकडे पहातच बसलो." सकाळी सकाळी गंमत करू नको कैवल्य" त्याच्या आईने त्याला सुनावलं."गंमत नाही करत मी खरंच मला जाँब मिळतोय ."त्याच्या वाक्याने आमचे चेहरे आनंदाने फुलले.या आनंदामागे थोडं दु:खही दाटलेले होते." काय करू काय विचारतोस ?जायचं .""पप्पा, जास्त नाही तीन-चार वर्षे तिकडे जाँब करून इकडे येईन." आमची मन:स्थिती कैवल्यला कळली असावी म्हणूनच तो असं बोलला. त्याच्या बोलण्यानं मला दिलासा मिळाला." काय जाँब आहे ?""पप्पा, उद्या इंटरव्ह्यू आहे फोर्टला,मोठी कंपनी आहे.त्यानंतर सर्व काही ठरेल."" बेस्ट लक ,तू जा.फक्त सर्व माहिती नीट घेऊन ठेव."" त्याची काळजी करू नका ,फक्त मम्मीला समजावा."" नक्की ,ते तू माझ्यावर सोड "मी आत्मविश्वासानं सांगितलं.कैवल्यला परदेशात नोकरी मिळणार या कल्पनेने माझी छाती अभिमानाने फुलून आली होती.त्याच्या आईला मात्र वाईट वाटलं होतं.आत्तापर्यंत शेजारीपाजारी आपला नातेवाईक अमेरिकेत असल्याच्या फुशारक्या मारायचे.आता मीही फुशारक्या मारायला तयार झालो होतो.कैवल्यचा इंटरव्ह्यू अतिशय सुंदर झाला.आणि आमच्या अपेक्षेप्रमाणे त्याला यु.एस.मध्ये जाँब निश्चित झाला.पगारही भलाभक्कम होता.इतर सोयी सवलतींची तर सरबत्ती होती.परंतु तरिही कैवल्य नाराज होता.मोठ्या उत्साहासाने इंटरव्ह्यूला गेलेल्या कैवल्यचा उत्साह मावळलेला दिसत होता.शेवटी न राहवून मी त्याला विचारलं." का रे नाराज तू ? एवढा चांगला जाँब आहे ना ?""पप्पा, जाँब चांगला आहे.तिकडे गेल्यावर पैसेही खूप मिळतील पण तिथे जाण्यासाठी कमीतकमी दोन लाख रूपयांची गरज आहे.आणि एवढे पैसे म्हणजे ?...."हताश झालेला कैवल्य पुढे काहीच बोलला नाही.शेवटी मी त्याची समजूत काढली."अरे, पैसे लागणारच ,पेरल्या शिवाय थोडंच उगवणार.आणि पैसे काय फुकट जाणार आहेत.हे बघ पैशांची तू काळजी करु नकोस.तयारीला लाग .""पण ,पप्पा...."" आता म्हटलं ना तयारीला लाग ." त्याच्या पाठीवर थोपटत मी म्हणालो. आणि कैवल्यचा चेहरा हास्याने उजळला.कैवल्य परदेशी जाणार म्हणून ही थोडी दु:खीच होती.परंतु मी तिला समजावलं. ‘ मुलाच्या भवितव्याच्या आड भावना आणू नकोस ’असं सांगितल्यावर ती थोडी सावरली होती.एक दिवस तिने मला अचानक विचारलं " पैशाचं काय करणार आहात तुम्ही ?"तिच्या वाक्यावर मी हसलो."हसून प्रश्न सुटत नाहीत." ती म्हणाली.’ अगं ,तू असं विचारतेस की सगळे पैसे संपले.""तसं नाही पण तयारी तर करायली हवी.""बँन्केत आहेत ,काही एफ़.डी.मोडायला लागतील.आज उद्या त्या मोडीन ." माझ्या वाक्यावर तिला थोडं बर वाटलं." आणि गाडीचं काय करणार ?समजा नंबर लागला तर ?"तिने माझ्या वर्मावरच बोट ठेवलं.जो विषय मी टाळतं होतो तो तिनं अचूक काढला."गाडीचं काय ?नंतर बघू.रिटायर्ड झाल्यावर घेऊ."" अहो, पण तुमचं स्वप्न ?"" मुलांच्या स्वप्नांपुढे आपली स्वप्ने काय महत्वाची ?तसं त्या गाडीचा विषयही मागे पडलाय.मी गाडीसाठी ठेवलेली दिड लाख काढतो.थोडी भर करू. कैवल्यला चांगली संधी आलेय.ती वाया जाता कामा नये."बायको माझ्याकडे बघतच बसली."बघतेस काय अशी, आपण मध्यमवर्गीय , आपल प्रपंच हेच आपलं सुख, मुलांच्या स्वप्नांपुढे माझी स्वप्ने महत्वाची असतील ,तर मी स्वार्थी नाही का? " माझ्या मनातल्या भावना तिला कळल्या होत्या.आठ-दहा दिवसातच मी पैशाचा बंदोबस्त केला.नयनासाठी ठेवलेले पैसे आणि एफ़.डी.मोडून मी सर्व पैसे घरी आणले.आणि कैवल्यची जाण्याची सर्व तयारी पूर्ण झाली.एफ़.डी.मोडताना एक लाखाची ती देखणी पिवळी गाडी माझ्या डोळ्यासमोर येत होती.गेले चाळीस वर्षे पाहात आलेलं स्वप्न हवेत विरून गेलं .ते पूर्ण होईल की नाही हे सांगता येणंही कठीण होतं.पण , त्याचवेळी एक नवीन स्वप्न डोळ्यात आकार घेत होतं...माझ्या मुलाच्या २५ लाखाच्या गाडीत बसण्याचं !


लेखक - सुनिल पाटकर
.....................

प्रपंच दिवाळी अंक २००९ मध्ये आयोजित केलेल्या शिर्षक कथा स्पर्धेत माझ्या नयना कथेची ६५० कथांमधून निवड झाली.











......